येरमाळा : वाशी तालुक्यातील कडकनाथवाडी येथे विनाकारण शिवीगाळ का करतो, अशी विचारणा केल्याच्या रागातून एका ३० वर्षीय तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून हाताला चावा घेतल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी विकास भारत जगताप (रा. कडकनाथवाडी) याच्याविरोधात येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रमोद रामभाऊ जगताप (वय ३०, रा. कडकनाथवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १० मे २०२५ रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास कडकनाथवाडी येथे घडली. आरोपी विकास भारत जगताप हा फिर्यादी प्रमोद जगताप यांना विनाकारण शिवीगाळ करत होता. प्रमोद यांनी त्याला ‘शिवीगाळ का करत आहेस?’ असे विचारले. याचा राग आल्याने विकासने प्रमोद यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि त्यांच्या हाताला चावाही घेतला.
या हल्ल्यानंतर प्रमोद जगताप यांनी ११ मे २०२५ रोजी येरमाळा पोलीस ठाण्यात धाव घेऊन विकास जगताप विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्रमोद यांच्या फिर्यादीवरून आरोपी विकास विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३) आणि ३३३ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास येरमाळा पोलीस करत आहेत.