कळंब : भावाशी भांडण का केले, या कारणावरून गैरकायद्याची मंडळी जमवून एका तरुणाला लोखंडी रॉड आणि दांड्याने बेदम मारहाण करत गंभीर जखमी केल्याची घटना कळंब येथील आयटीआय कॉलेजसमोर घडली. यावेळी आरोपींनी तरुणाच्या खिशातील ५० हजार रुपयांची रोकडही काढून घेतली. याप्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात ५ जणांसह इतर दोन अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, ताहेर युसुफ शेख (वय ३६, रा. गांधीनगर, कळंब) हे ३ मार्च २०२६ रोजी दुपारी अडीच वाजेच्या (१४:३० वा.) सुमारास आयटीआय कॉलेज कळंबसमोरील तांदुळवाडी शिवार येथे होते. त्यावेळी आरोपी प्रदिप डिकले, प्रितम डिकले, मोक्षे भोरे, सागर थोरात (सर्व रा. डिकसळ, ता. कळंब), प्रमोद ऊर्फ पोपट डिकले (रा. तांदुळवाडी) आणि इतर दोन अनोळखी इसम तेथे आले. त्यांनी ताहेर यांना ‘आमच्या भावासोबत भांडण का केले?’ असे विचारत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
पाहता पाहता या टोळक्याने बेकायदेशीररीत्या जमाव जमवून ताहेर यांना लाथाबुक्क्यांनी, तसेच लोखंडी रॉड व लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात ताहेर शेख गंभीर जखमी झाले आहेत. मारहाण केल्यानंतर या आरोपींनी ताहेर यांच्या खिशातील ५० हजार रुपयांची रोख रक्कम जबरीने काढून घेतली आणि तेथून पळ काढला.
या घटनेनंतर ताहेर शेख यांनी ४ मार्च २०२६ रोजी कळंब पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. या प्रथम खबरेवरून पोलिसांनी सर्व आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (भा.दं.वि.सं.) कलम ११८(२), ११९(१), ३५२, ३५१(२), १८९(२), १८९(४), १९०, १९१(१), १९१(२), १९१(३), आणि ११५(२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कळंब पोलीस करत आहेत.







