उमरगा/लोहारा : खरीप २०२४ मधील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या लोहारा आणि उमरगा तालुक्यातील तब्बल ३८ हजार शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेले ४१ कोटी रुपयांचे अतिवृष्टी अनुदान अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांनी केलेल्या अथक पाठपुराव्याला हे यश आले असून, ऐन हंगामात पैसे हाती पडू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सुरुवातीला प्रस्ताव झाला होता नामंजूर
खरीप २०२४ मध्ये लोहारा आणि उमरगा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली होती. मात्र, सुरुवातीला प्रशासकीय पातळीवर या दोन्ही तालुक्यांचा अतिवृष्टीचा प्रस्ताव नाकारण्यात आला होता. या अन्यायाविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांनी आवाज उठवत तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांकडे तीव्र आग्रह धरला. त्यांच्या रेट्यामुळे प्रशासनाने सुधारित प्रशासकीय अहवाल तयार केला आणि दोन्ही तालुक्यातील ७९ हजार ८८० शेतकऱ्यांसाठी ८६ कोटी ४६ लाख ३४ हजार रुपयांच्या अनुदानाचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठवला.
आंदोलनानंतर मिळाली होती शासनाची मंजुरी
विभागीय आयुक्तांकडून हा प्रस्ताव मंत्रालयात जाण्यास विलंब झाल्याने हे हक्काचे अनुदान वर्षभर रखडले. या लालफीतशाहीच्या विरोधात अनिल जगताप यांनी रस्त्यावर उतरून धरणे आंदोलन आणि रस्ता रोको केला. त्यांच्या या प्रखर लढ्याला यश आले आणि एका वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर राज्य शासनाने २०२५ मध्ये ८६ कोटी ४६ लाख ३४ हजार रुपयांच्या निधीला मंजुरी दिली.
केवायसी होऊनही ५ महिने रखडले होते अनुदान
निधी मंजूर झाल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात सुमारे ५० हजार शेतकऱ्यांना अनुदानाचे वाटप करण्यात आले. मात्र, ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करूनही तब्बल पाच महिने उलटले तरी ३८ हजार शेतकऱ्यांचे ४१ कोटी रुपयांचे अनुदान तांत्रिक कारणांमुळे रखडले होते.
अखेर पाठपुराव्याला यश
शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊन अनिल जगताप यांनी पुन्हा एकदा थेट प्रशासन आणि मंत्रालय स्तरावर जोरदार पाठपुरावा सुरू केला. त्यांच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे अखेर प्रशासकीय यंत्रणा हलली असून, रखडलेल्या ३८ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर ४१ कोटी रुपयांचे अनुदान वितरित होण्यास सुरुवात झाली आहे. जगताप यांच्या या प्रयत्नांचे लोहारा आणि उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांकडून कौतुक होत आहे.
“सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील”
“सध्या रखडलेले अनुदान जमा होण्यास सुरुवात झाली असली तरी, अतिवृष्टी अनुदान २०२४ मंजूर असलेल्या सर्व ७९ हजार ८८० शेतकऱ्यांच्या खात्यात जोपर्यंत रक्कम जमा होत नाही, तोपर्यंत आपला प्रयत्न आणि संघर्ष असाच सुरू राहील,” अशी ठाम भूमिका सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांनी यावर बोलताना व्यक्त केली.