तुळजापूर: तालुक्यातील नांदुरी येथे शेत रस्त्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका व्यक्तीला लोखंडी रॉड आणि पाईपने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना शनिवार, दि. ०१ जून २०२५ रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास जिल्हा परिषद शाळेजवळ घडली. याप्रकरणी सात जणांविरुद्ध तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहन नागनाथ मुळे (रा. नांदुरी, ता. तुळजापूर) असे फिर्यादीचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गावातील जिल्हा परिषद शाळेजवळ आरोपी श्रीधर नारायण मुळे, लखन नारायण मुळे, महादेव सरडे, शिवाजी दगडू सरडे, अजय धनाजी सरडे, शंकर कोंडीबा सरडे आणि ब्रम्हदेव भिमराव सरडे (सर्व रा. नांदुरी) यांनी त्यांना अडवले.
शेत रस्त्याच्या जुन्या वादातून आरोपींनी मोहन मुळे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर हा वाद विकोपाला जाऊन आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी, लोखंडी रॉडने आणि पाईपने मारहाण केली. यामध्ये मोहन मुळे जखमी झाले. तसेच, आरोपींनी त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
या घटनेनंतर मोहन मुळे यांनी मंगळवार, दि. ०३ जून २०२५ रोजी तामलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सातही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), १८९(२), १९१(२), १९०, ११५(२), ३५२, ३५१(२), आणि ३५१(३) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.