वाशी – गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वाशी तालुक्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. वाशी शहर, घोडकी, घाटपिंपरी आणि फाकराबाद परिसरात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी आज पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा करून जिल्हा प्रशासनाला नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे, ज्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रस्ते, वीजपुरवठा आणि वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. शेतकऱ्यांची उभी पिके पाण्याखाली गेल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली असून, काही शेतकऱ्यांची जनावरे पुरात वाहून गेल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
या गंभीर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी आज बाधित गावांना भेट दिली. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे आदेश देत महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करून मदत व नुकसानभरपाईची कार्यवाही सुरू करण्याच्या सूचना दिल्या. तसेच, आपत्तीत अडकलेल्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले.
“आपत्तीच्या या काळात सर्वांनी एकमेकांना सहकार्य करावे, संयम ठेवावा व सुरक्षित ठिकाणी राहावे,” असे आवाहन खासदार राजेनिंबाळकर यांनी नागरिकांना केले.
या पाहणी दौऱ्यादरम्यान जिल्हाप्रमुख रणजित पाटील, तालुकाप्रमुख तात्या गायकवाड, तहसीलदार म्हेत्रे, युवासेना तालुकाप्रमुख गणेश भराटे, शहरप्रमुख अनिल गवारे आदी मान्यवर उपस्थित होते.