मुरुम : मुरुम-लातूर प्रवासादरम्यान राष्ट्रीय महामार्ग ६५ वरील दाळिंब उड्डाणपुलाजवळ एका वाहनाला अडवून सहा अज्ञातांनी तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या थरारक घटनेत लुटारूंनी १ लाख १४ हजार रुपयांची रोकड बळजबरीने हिसकावून नेली. ही घटना शनिवारी (ता. २८) रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास घडली असून, याप्रकरणी मुरुम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, लातूर शहरातील मोतीनगर भागात राहणारे ऋषीकेश दयानंद जाधव (वय २७) हे शनिवारी (ता. २८) रात्री २२.१५ वाजेच्या सुमारास त्यांचा ड्रायव्हर शुभम याच्यासोबत त्यांच्या ‘बडा दोस्त’ (क्र. एमएच २४ एटी ४६८६) या गाडीने मुरुम येथून लातूरकडे प्रवास करत होते. त्यांची गाडी राष्ट्रीय महामार्ग ६५ वरील दाळिंब उड्डाणपुलाजवळ आली असता, एका पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा कारमधून सहा जण तिथे आले. त्यांनी आपली इनोव्हा जाधव यांच्या गाडीसमोर आडवी लावून त्यांना थांबण्यास भाग पाडले.
गाडी थांबताच या सहा जणांनी फिर्यादी ऋषीकेश जाधव यांना बळजबरीने गाडीबाहेर ओढले. त्यानंतर काहीही न बोलता त्यांना चापटाने, तसेच हंटर व बेल्टने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या अचानक झालेल्या हल्ल्याने जाधव घाबरून गेले. याच वेळी लुटारूंनी त्यांच्याकडील १ लाख १४ हजार रुपयांची रोख रक्कम बळजबरीने हिसकावून घेतली आणि तेथून पोबारा केला.
या धक्कादायक प्रकारानंतर ऋषीकेश जाधव यांनी रविवारी (ता. २९) मुरुम पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या प्रथम खबरेवरून मुरुम पोलिसांनी सहा अज्ञात व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१०(२), ३११ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. महामार्गावर झालेल्या या लूटमारीमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस या लुटारूंचा कसून शोध घेत आहेत.





