नळदुर्ग: अवघ्या तीन किलोमीटरवर असलेले बोरी धरण तुडुंब भरलेले असताना, नळदुर्ग शहराला मात्र पंधरा दिवसांतून एकदाच पाणी मिळत आहे. दुसरीकडे, ३५ किलोमीटर दूर असलेल्या तुळजापूरला याच धरणातून नियमित पाणीपुरवठा होत आहे. प्रशासनाच्या या अजब कारभाराला आणि दुजाभावाला कंटाळलेल्या संतप्त नळदुर्गकरांनी सोमवारी थेट नगर परिषदेवर ‘गाढव मोर्चा’ काढून आपला रोष व्यक्त केला.
ऐतिहासिक किल्ला गेटपासून निघालेल्या या आगळ्यावेगळ्या मोर्चात प्रशासनाच्या नावाने घोषणाबाजी करत नागरिक सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, एका गाढवाच्या गळ्यात ‘मुख्याधिकारी’ नावाचा फलक अडकवून, जणू काही सुस्त प्रशासनाचीच धिंड काढली जात होती. क्रांती चौक, बसवेश्वर चौक मार्गे नगर परिषदेवर धडकलेल्या या मोर्चात नागरिकांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर शाब्दिक प्रहार केले.
“धरण भरलेलं आहे, पण आमच्या नळाला पाणी नाही. हा कुठला न्याय?” असा संतप्त सवाल प्रमोद कुलकर्णी, ज्योतिबा येडगे, मुन्ना शेख,अझहर जहागीरदार, शिवाजी गायकवाड, संतोष पुदाले, सतीश पुदाले, मुकुंद नाईक, अमीर शेख, शहाबाज काझी,दगडू डुकरे, कमलाकर चव्हाण यांच्यासह अनेक आंदोलकांनी केला. पाणीपुरवठा, स्वच्छता आणि दिवाबत्ती या मूलभूत सुविधा न मिळाल्यास पालिकेला कुलूप ठोकून राष्ट्रीय महामार्गावर ‘रास्ता रोको’ करण्याचा खणखणीत इशाराही यावेळी देण्यात आला.
प्रशासनाचा सारवासारवीचा पाढा
नागरिकांचा संताप अनावर झाल्यानंतर पालिका प्रशासनाने नेहमीप्रमाणे सारवासारव केली. प्रभारी मुख्याधिकारी महोदय बैठकीचे कारण देत मोर्चाला सामोरे आलेच नाहीत. प्रशासनाने १९८० सालची जुनाट पाणीपुरवठा योजना, अमृत २.० योजनेचे रखडलेले काम आणि महावितरणच्या विजेचा लपंडाव यांसारख्या समस्यांचा पाढा वाचून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. अखेरीस, आंदोलकांच्या रेट्यापुढे झुकत प्रशासनाने लेखी आश्वासन दिले.
मात्र, ‘धरण जवळ असूनही पाणी का नाही?’ या मूळ प्रश्नाचे ठोस उत्तर गुलदस्त्यातच राहिले. त्यामुळे, लेखी आश्वासन मिळूनही नळदुर्गकरांच्या घशाची कोरड कधी मिटणार, हा प्रश्न कायम आहे.