धाराशिव: विहिरीतील पाण्याच्या हिश्श्यावरून झालेल्या वादातून आपल्या सख्या चुलत भावावर कोयत्याने वार करून अत्यंत निर्घृणपणे खून केल्याप्रकरणी आरोपी नवनाथ अप्पाराव पाटील यास मा. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश-४ श्री. राजेश के. खोमणे साहेब (धाराशिव) यांनी दोषी ठरवून जन्मठेप आणि ५,००० रुपये द्रव्यदंडाची शिक्षा सुनावली आहे. हा ऐतिहासिक निकाल आज दिनांक २५ जून २०२६ रोजी देण्यात आला.
प्रकरणाची पार्श्वभूमी
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी रमेश पंडित पाटील (रा. सराटी, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यांचे वडील पंडित पाटील, चुलते नागनाथ पाटील आणि मयत चुलते नरसाप्पा बाबुराव पाटील हे सख्खे भाऊ आहेत. सराटी शिवारातील गट नं. १०५ मध्ये त्यांची ५ एकर सामाईक वडिलोपार्जित जमीन असून, त्यात एक सामाईक विहीर आहे. या विहिरीच्या पाण्यावरून आरोपी नवनाथ अप्पाराव पाटील आणि चुलते नरसाप्पा पाटील यांच्यात सतत वाद होत असत, कारण आरोपी विहिरीच्या पाण्याचा एकटाच उपभोग घेत होता आणि नरसाप्पा यांना पाणी घेऊ देत नव्हता.
घटनेच्या १५ दिवस आधी गावातील पंच कमिटीसमोर बैठक होऊन आरोपीने नरसाप्पा पाटील यांना विहिरीत मोटार टाकून पाणी घेण्यास परवानगी दिली होती. त्याप्रमाणे त्यांनी मोटार विहिरीत टाकली होती, मात्र वायर जोडणे बाकी होते.
दिनांक १३ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास, नरसाप्पा पाटील हे विहिरीवरील मोटारला वायर जोडण्यासाठी गेले. त्यांच्या पाठोपाठ फिर्यादी रमेश पाटील हे देखील शेतात गेले असता, नरसाप्पा हे वीज पोलवरील डब्यामध्ये वायर जोडत होते. त्याच वेळी आरोपी नवनाथ पाटील याने पाठीमागून येऊन त्याच्या हातातील कोयत्याने नरसाप्पा यांच्या डोक्यात वार केला. नरसाप्पा मागे वळताच आरोपीने त्यांच्या हनुवटीवरही दुसरा वार केला. घटनेनंतर आरोपी हातात कोयता घेऊन त्याच्या लाल रंगाच्या अल्टो कारमध्ये बसून धनगरवाडी रोडने पसार झाला. गंभीर जखमी नरसाप्पा पाटील यांना उपचारासाठी अणदूर येथील डॉ. बिराजदार यांच्या दवाखान्यात व त्यानंतर सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
पोलीस तपास
याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५२३/२०२३, भारतीय दंड विधान (भा.दं.वि.) कलम ३०२ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. या प्रकरणाचा प्राथमिक तपास स.पो.नि. श्री. पी. आर. तायवाडे आणि पुढील तपास स.पो.नि. श्री. व्ही. एस. आटोळे यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल केले होते.
न्यायालयीन सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे एकूण १७ साक्षीदार तपासण्यात आले.
प्रत्यक्षदर्शी साक्षीदार फितूर, पण ‘मृत्युपूर्व जबाब’ ठरला महत्त्वाचा:
या खटल्यात एक धक्कादायक वळण आले, जेव्हा प्रकरणातील एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि फिर्यादी रमेश पंडित पाटील हा साक्षीपुराव्यादरम्यान फितूर (Hostile) झाला. न्यायालयाने मयतास मारताना पाहिले नसल्याचे त्याने न्यायालयात सांगितले.
परंतु, सरकार पक्षातर्फे साक्षीदार क्र. ३ पंडित पाटील (मयत नरसाप्पा यांचे सख्खे भाऊ) यांची साक्ष अत्यंत महत्त्वाची ठरली. नरसाप्पा यांनी जखमी अवस्थेत असताना स्वतःच्या मोबाईलवरून पंडित पाटील यांना फोन करून “मला नव्याने सत्तुरने (कोयत्याने) डोक्यात मारले आहे” असे सांगितले होते. मयताने मृत्यूपूर्वी आपल्या मृत्यूचे कारण सांगितले असल्यामुळे, मा. न्यायालयाने हा फोनवरील संवाद ‘तोंडी मृत्यूपूर्व जबाब’ (Oral Dying Declaration) म्हणून ग्राह्य धरला.
सरकारी वकिलांचा प्रभावी युक्तिवाद:
फिर्यादी फितूर झालेला असतानाही, सरकार पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता सचिन एस. सूर्यवंशी यांनी मा. सर्वोच्च न्यायालयाचे विविध न्यायनिवाडे (Precedents) सादर केले. उलटतपासणीत आलेला पुरावा आणि इतर भक्कम परिस्थितीजन्य पुरावा (Circumstantial Evidence) ग्राह्य धरण्यात यावा, असा प्रभावी युक्तिवाद त्यांनी केला. मा. न्यायालयाने हा युक्तिवाद मान्य करत आरोपी नवनाथ पाटील याला भा.दं.वि. कलम ३०२ अंतर्गत दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अति. शासकीय अभियोक्ता श्री. सचिन एस. सूर्यवंशी यांनी बाजू मांडली, तर कोर्ट पैरवी म्हणून पोलीस हेड कॉन्स्टेबल एस. एल. जट्टे (ब. नं. २२७) आणि स.पो.फौ. श्री. जी. व्ही. शिंदे (ब. नं. ९४९) यांनी चोख कामगिरी बजावली.







