अहो मंडळी, काय सांगू तुम्हाला! आज धाराशिवच्या जिल्हाधिकारी कचेरीत नुसता ‘धुरळा’ उडाला होता. निमित्त होतं श्री तुळजाभवानी मंदिराच्या विकासाचं आणि देवीच्या दर्शनाच्या व्हीआयपी पासच्या ‘काळ्या बाजाराचं’. आपले दबंग खासदार ओमराजे निंबाळकर यांनी बैठक बोलावली होती. सोबत तुळजापूरचे काही नागरिक आणि पुजारी मंडळीही होती. देवीच्या कामासाठी बैठक, म्हणजे सगळं कसं मंगलमय वातावरणात व्हायला हवं, नाही का? पण इथं तर वेगळाच ‘खेळ’ सुरू झाला!
अधिकारी आले, पण ‘मुहूर्तावर’ नाही!
बैठक सुरू व्हायची वेळ झाली, खासदार आले, नागरिक आले, पुजारी आले… पण जिल्ह्याचे ‘कॅप्टन’ म्हणजे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार साहेब तब्बल १५ मिनिटं उशिरा आले! आता खासदार ओमराजेंचा पारा चढणार नाही तर काय? जणू काही शाळेत गुरुजी आलेत आणि मॉनिटरच उशिरा! त्यात भर म्हणजे, पोलीस खात्याचे प्रमुख, आपले पोलीस अधीक्षक संजय जाधव साहेब, तर बैठकीला ‘गोल’ मारून गायब! आता सांगा, खासदारांनी राग व्यक्त नाही करायचा तर काय करायचं? कुणीतरी सांगावं की बाबांनो, खासदारांनी बोलावलेल्या बैठकीला पण ‘लेट लतीफ’ कसं चालतं?
व्हीआयपी पासचा ‘गोरखधंदा’
मग सुरू झाला व्हीआयपी पासच्या काळ्या बाजाराचा पाढा. खासदार म्हणाले, “अहो, इथं आमदार आणि अधिकाऱ्यांच्या नावावर पास छापले जातात आणि ते थेट कर्नाटक, पुणे, मुंबईच्या भाविकांना पैशात विकले जातात! कमाल म्हणजे, ना त्या पासची पंचिंग, ना डायरीवर नोंद! हा काय दर्शनाचा ‘शॉर्टकट’ आहे की देवीच्या नावावरचा ‘धंदा’?” कुणीतरी या पास विकणाऱ्या ‘एजंटांवर’ कारवाई करणार की नाही? की देवीच बघून घेईल म्हणून सगळे गप्प बसलेत?
‘वाँटेड’ आरोपी आणि ‘सायलेंट’ एसपी!
पासचा विषय जरा शांत होतोय तोच तुळजापूरच्या ड्रग्ज प्रकरणाचा बॉम्ब फुटला. तब्बल २२ आरोपी दीड महिन्यांपासून फरार! आणि आपले पोलीस अधीक्षक साहेब यावर काही ‘बोलत भी नाहीत आणि सांगत भी नाहीत’. खासदार म्हणाले, “यांच्यावर कुणाचा दबाव आहे, हे सगळ्यांना माहीत आहे!” आता हे ‘सगळ्यांना माहीत असलेलं’ रहस्य काय आहे, हे देवीच जाणे! की आरोपी आणि पोलीस यांच्यात ‘पकडापकडी’चा खेळ सुरू आहे, आणि आरोपी नेहमी जिंकतायत?
ऑफिस नाही तर रोज ‘ठाण’!
आणि शेवटचा अंक होता ऑफिसच्या जागेचा! पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी शिफारस करूनही खासदारांना जिल्हाधिकारी कार्यालयात बसायला जागा मिळत नाहीये. यावरून खासदार पुन्हा संतापले. त्यांचा थेट आरोप भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर! “तेच यामागचे सूत्रधार आहेत, तेच कळीचे नारद आहेत,” असं खासदार गरजले. आता सांगा, लोकप्रतिनिधीलाच बसायला जागा नसेल तर काम कुठं बसून करायचं? पण आपले खासदार पण कमी नाहीत! त्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांनाच तंबी दिली, “ठीक आहे, मला ऑफिस नका देऊ, मी रोज जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन ठाण मांडतो!”
आता विचार करा मंडळी, रोज सकाळी खासदार साहेब खुर्ची टाकून कचेरीत बसलेले दिसतील! मग काय, जिल्हाधिकाऱ्यांना रोज एक्स्ट्रा चहा आणि नाश्त्याची सोय करावी लागणार! एकूण काय, तर धाराशिवच्या कचेरीत सध्या विकासाच्या आराखड्यापेक्षा अधिकाऱ्यांच्या उशिरा येण्याचा, व्हीआयपी पासच्या काळ्या बाजाराचा, गायब आरोपींचा आणि जागेच्या वादाचाच ‘विकास’ जास्त जोरदार सुरू आहे असं दिसतंय! बघूया पुढे काय होतंय!
- बोरूबहाद्दर