धाराशिव – जिल्ह्यातील २५० कोटींपेक्षा अधिक विकासकामांना स्थगिती मिळाल्यानंतर, शिवसेना (ठाकरे गट) खासदार ओमराजे निंबाळकर यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर फेसबुक पोस्टद्वारे हल्ला चढवला आहे. विशेष म्हणजे, त्यांनी मुख्यमंत्र्यांचा फोटोही पोस्टमध्ये जोडत सरकारच्या ‘दुहेरी भूमिकेवर’ सवाल उपस्थित केला आहे.
“स्थगिती कुणाच्या सांगण्यावरून?” – ओमराजेंचा थेट सवाल
फेसबुक पोस्टमध्ये ओमराजेंनी लिहिलं आहे:
“विकास कामांना स्थगिती.. कोणाच्या सांगण्यावरून? मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्र फडणवीस यांच्या!”
ते पुढे म्हणतात –
“धाराशिव जिल्ह्याचा भरभरून विकास होणार, कायापालट होणार, अशा वल्गना सातत्याने केल्या गेल्या. निवडणुकीच्या काळात घोषणांचा पाऊस पडला. पण वास्तवात काय? काहीच नाही!”
फडणवीस सरकारवर ‘दात वेगळे’ टोला
“एकीकडे सभागृहात म्हणायचं ‘मी काही उद्धव ठाकरे नाही, जो कामांना स्थगिती देईन’, आणि दुसरीकडे धाराशिवमधील २५० कोटींच्या कामांना स्थगिती द्यायची – हे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे आहेत!”
तीन वर्षांपासून कामं रखडलीच आहेत!
ओमराजे यांनी आठवण करून दिली की, शिंदे सरकार सत्तेवर आल्यानंतर जिल्ह्यातील शेकडो कोटींच्या मंजूर कामांना स्थगिती मिळाली होती आणि ती कामं तीन वर्षांनंतरही पूर्ण झालेली नाहीत.
“आता फडणवीस सरकार आलं तरी काही बदल दिसत नाही.”
“उलटी गंगा सरकारनेच सुरू केली!”
ते पुढे म्हणतात:
“आकांक्षित जिल्ह्यांकडे विशेष लक्ष देऊन विकास व्हायला हवा होता. पण इथे तर उलटी गंगा प्रवाहित केली जात आहे!”
“जनता वेळ आली की हिशोब करेल” – ओमराजेंचा इशारा
ओमराजेंच्या शेवटच्या ओळीत सत्ताधाऱ्यांना थेट इशारा आहे –
“धाराशिव जिल्हा विकासापासून वंचित ठेवणाऱ्या या सरकारचा वेळ आल्यावर लोक बरोबर हिशोब करतील, हे लक्षात असू द्या.”