वाशी : आपल्या हक्काच्या जमिनीचा योग्य मोबदला मागणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी बेछूट आणि अमानुष लाठीमार केल्याची संतापजनक घटना वाशी तालुक्यातील तांदुळवाडी शिवारात घडली आहे. पवनचक्की कंपनीच्या इशाऱ्यावर पोलिसांनीच बळीराजावर लाठ्या उगारल्याने परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून, ‘आमचा गुन्हा काय?’ असा संतप्त सवाल शेतकरी विचारत आहेत. या घटनेचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तांदुळवाडी येथील शेतकरी गणेश शेरकर यांच्या शेतातून दोन वेगवेगळ्या कंपन्यांच्या पवनचक्कीच्या विद्युत लाईनचे टॉवर जात आहेत. एका कंपनीने दिलेल्या दरानेच दुसऱ्या कंपनीनेही जमिनीचा मोबदला द्यावा, ही शेतकऱ्यांची रास्त मागणी होती. मात्र, संबंधित कंपनीने शेतकऱ्यांशी कोणताही संवाद न साधता थेट पोलीस बळाचा वापर करत दडपशाहीचा प्रयत्न केला.
शेतकऱ्यांनी योग्य मोबदला मिळत नसल्याने शांततेत काम थांबवले होते. मात्र, शेतकऱ्यांच्या मागण्या ऐकून घेण्याऐवजी, कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना पाचारण केले. घटनास्थळी दाखल होताच पोलिसांनी कोणताही सारासार विचार न करता, थेट आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर हल्ला चढवला. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पोलीस शेतकऱ्यांवर निर्दयीपणे लाठ्या चालवताना दिसत आहेत. या अमानुष मारहाणीत काही शेतकरी जखमी झाले आहेत.
या संतापजनक प्रकारानंतर संतप्त शेतकऱ्यांनी वाशी पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेल्या प्रकाराविरोधात लेखी तक्रार दाखल केली आहे. अन्नदात्यावरच पोलिसांनी लाठी उचलल्याने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून, दोषी कंपनी आणि पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. कंपनीच्या नफेखोरीसाठी प्रशासन शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.