मुंबई : राज्यातील तब्बल ६४ लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट २५५५ कोटी रुपयांची विमा नुकसान भरपाई जमा होणार आहे. कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी याबाबत माहिती दिली.
शासनाने विमा कंपन्यांना देय असलेला प्रलंबित राज्य हिस्सा अनुदान म्हणून २८५२ कोटी रुपयांची रक्कम वितरित करण्यास मान्यता दिली आहे. यामुळे मागील विविध हंगामांतील प्रलंबित नुकसान भरपाईची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर जमा होणार आहे. ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना विमा कंपन्यांना देण्यात आल्या आहेत.
हंगामनिहाय नुकसान भरपाई
- खरीप २०२२ आणि रब्बी २०२२-२३ : २.८७ कोटी रुपये
- खरीप २०२३ : १८१ कोटी रुपये
- रब्बी २०२३-२४ : ६३.१४ कोटी रुपये
- खरीप २०२४ : २३०८ कोटी रुपये
एकूण २५५५ कोटी रुपयांची नुकसान भरपाई राज्यातील ६४ लाख लाभार्थी शेतकऱ्यांना मिळणार आहे.
कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी सांगितले की, शासनाने विमा कंपन्यांना निधी वितरित केला असून, नुकसान भरपाईची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल. या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल आणि आर्थिक संकटातून सावरण्यास मदत होईल.
धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा: खरीप २०२४ पीक विमा हप्ता लवकरच खात्यावर
धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी ट्विटद्वारे माहिती दिली आहे की, खरीप २०२४ पीक विमा हप्ता वितरणासाठी शासन निर्णय २७ मार्च २०२५ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
आमदार पाटील यांनी सांगितले की, या निर्णयामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुढील आठवड्यात त्यांच्या बँक खात्यांमध्ये विमा हप्ता जमा होण्याची अपेक्षा आहे. शासनाने वेळेवर घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.