धाराशिव – महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेत धाराशिव जिल्ह्यातील भूम, परंडा, वाशी आणि कळंब तालुक्यांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते भास्कर महादेव वारे यांनी केला आहे. सन २०२४-२०२५ या कालावधीत कृषी विभागामार्फत राबविण्यात आलेल्या या योजनेत, प्रत्यक्षात कामे न करताच बोगस मोजमाप पुस्तिका तयार करून शासकीय निधीचा अपहार करण्यात आल्याचे वारे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
लातूरच्या कृषी सहसंचालकांना सादर केलेल्या निवेदनानुसार, तालुका कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक आणि मंडळ अधिकारी यांनी संगनमत करून सिमेंट नाला बांध आणि कंपार्टमेंट बंडिंगची कामे कागदोपत्री दाखवली. प्रत्यक्षात ही कामे झालीच नसून, केवळ बनावट मोजमाप पुस्तिकांच्या आधारे शासनाची फसवणूक करण्यात आली, असा गंभीर आरोप वारे यांनी केला आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी भास्कर वारे यांनी केली आहे. सन २०२४-२०२५ मध्ये मंजूर झालेली व चालू असलेली कामे शासकीय परिपत्रक आणि अंदाजपत्रकातील नकाशाप्रमाणे योग्य ठिकाणी झाली आहेत का, याची तपासणी करण्यासाठी तातडीने एक चौकशी समिती नेमण्यात यावी, असे त्यांनी म्हटले आहे. या चौकशीत दोषी आढळणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करून, त्यांनी अपहार केलेली रक्कम शासनाच्या तिजोरीत जमा करावी, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.
या निवेदनाची एक प्रत माहिती व योग्य कार्यवाहीसाठी पुण्याच्या कृषी आयुक्तांनाही पाठवण्यात आली आहे. या आरोपामुळे कृषी विभागात मोठी खळबळ उडाली असून, प्रशासन यावर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.