बेंबळी: मेंढा शिवार (ता. धाराशिव) येथील पवनचक्कीवर ड्युटीवर असलेल्या एका सुरक्षा रक्षकाला १२ अज्ञातांच्या टोळक्याने लाकडी काठ्या आणि उसाने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. “तुमच्यामुळे आमच्या कंपनीचे नुकसान होत आहे,” असे कारण पुढे करत ही मारहाण करण्यात आली. याप्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्यात १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समाधान बंडु चव्हाण (वय २८, व्यवसाय सुरक्षा रक्षक, रा. एकंबीवाडी, ता. औसा, जि. लातूर) असे जखमी सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. समाधान हे मेंढा शिवारातील ११३ नंबरच्या पवनचक्कीवर सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. दि. ३० जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास समाधान हे जमिनीवर पडून मोबाईल पाहत असताना अचानक १२ अनोळखी इसम तिथे आले.
आरोपींनी समाधान यांना, “तुम्हारे वजहसे हमारे कंपनी का नुकसान हो रहा है, तुम ड्युटीपे क्यु आते है,” असे म्हणून वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर टोळक्याने त्यांना लाकडी काठी आणि उसाने मारहाण करून गंभीर जखमी केले. एवढेच नाही तर आरोपींनी समाधान यांची मोटरसायकल आणि मोबाईल फोडला. तसेच घटनास्थळी असलेल्या सतीश सागर यांचाही मोबाईल फोडून नुकसान केले.
याप्रकरणी जखमी समाधान चव्हाण यांनी १ फेब्रुवारी २०२६ रोजी बेंबळी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी १२ अनोळखी व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(२), ११५(२), १२७(२), ३२४(४), १८९(२), १९० आणि १९१(२)(३) अन्वये दंगल आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.





