धाराशिव : धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी ‘रात्री ७ ते ९ टीव्ही बंद’ ठेवण्याचे केलेले आवाहन वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने या आवाहनावर सडकून टीका केली असून, “टीव्ही बंदीच्या रंजक गोष्टीत वेळ घालवण्यापेक्षा प्रशासनाने ग्रामीण शाळांमध्ये मुलींसाठी सुरक्षित आणि बंधिस्त स्वच्छतागृहे बांधण्यावर लक्ष केंद्रित करावे,” असा खणखणीत सल्ला शिवसेनेचे जिल्हा प्रवक्ता जगदीश पाटील यांनी दिला आहे.
या संदर्भात काढण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात शिवसेनेने जिल्हा परिषदेच्या कारभाराचे वाभाडे काढले आहेत. टीव्ही पाहणे हा प्रत्येक कुटुंबाचा वैयक्तिक विषय असून सध्या विद्यार्थ्यांचा ओढा टीव्हीपेक्षा मोबाईलकडे जास्त आहे. त्यामुळे झेडपी अध्यक्षांचे हे आवाहन अवैज्ञानिक आणि मूळ प्रश्नांवरून लक्ष विचलित करणारे असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.
शाळांची अवस्था चिंताजनक; प्रशासनाला विचारले खडे सवाल
जिल्ह्यातील ग्रामीण शाळांमध्ये आजही पिण्याचे स्वच्छ पाणी नाही, शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलींसाठी सुरक्षित स्वच्छतागृहे नाहीत, या वास्तवाकडे शिवसेनेने लक्ष वेधले आहे. प्रशासनाला धारेवर धरताना त्यांनी खालील प्रश्न उपस्थित केले आहेत:
-
‘पिंक रूम’ आणि मुलींची सुरक्षितता: ठाणे जिल्हा परिषदेने मुलींसाठी ‘पिंक रूम’ योजना राबवली, तशी धाराशिवमध्ये किती शाळांत राबवली? किती ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन आणि इन्सिनरेटर आहेत? आणि प्रशासनाकडे मुलींच्या शाळा गळतीचा (Dropout Rate) काही डेटा आहे का?
-
अतिवृष्टीग्रस्त १३७ शाळांचे काय? अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील तब्बल १३७ शाळांचे नुकसान झाले आहे. छत गळती, पडक्या भिंती आणि वाहून गेलेली स्वच्छतागृहे अशा परिस्थितीत मुलींच्या सुविधांचे काय झाले? दुरुस्तीची कामे अद्याप का सुरू नाहीत?
-
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता: शाळांमध्ये स्वच्छता सुविधा नसणे हे शिक्षणाच्या हक्काचे (कलम २१अ) थेट उल्लंघन असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. धाराशिव जिल्हा परिषदेने या आदेशाची दखल कधी घेतली आणि काय कार्यवाही केली? असा सवाल विचारण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यातील शाळांच्या स्वच्छतागृहांची सखोल पाहणी करून अहवाल सार्वजनिक करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
शिवसेनेच्या प्रमुख मागण्या:
१. जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत मुलींसाठी खाजगीपणा जपणारी, पाणी आणि विजेची सोय असलेली स्वतंत्र व बंधिस्त स्वच्छतागृहे त्वरित बांधण्यात यावीत.
२. सध्या अस्तित्वात असलेल्या स्वच्छतागृहांची देखभाल, साफसफाई व पाणीपुरवठ्यासाठी नियमित यंत्रणा कार्यान्वित करावी.
३. अतिवृष्टीचा फटका बसलेल्या १३७ शाळांमधील स्वच्छतागृहांची तातडीने दुरुस्ती करावी.
४. या सर्व उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी जिल्हा परिषदेने आगामी पाच वर्षांची सुस्पष्ट कृती योजना (Action Plan) जनतेसमोर जाहीर करावी.
“जिल्हा परिषदेने अशक्य अशी शैक्षणिक आव्हाने देण्यापूर्वी मूलभूत प्रश्न सोडवावेत, तरच जनता त्यांच्या आवाहनाला गांभीर्याने घेईल,” असा इशाराही जगदीश पाटील यांनी या पत्रकाच्या माध्यमातून दिला आहे.







