येरमाळा: शेतातील पिकाला पाणी देण्यासाठी स्प्रिंकलर बदलण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींना अडवून त्यांना जातिवाचक शिवीगाळ करत, लाथाबुक्क्यांनी व दगडाने मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना कळंब तालुक्यातील शिंगोली शिवारात घडली आहे. या प्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात एकाच वेळी भारतीय न्याय संहिता (BNS) आणि ॲट्रासिटी ॲक्टनुसार गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नेमकी घटना काय?
फिर्यादी लक्ष्मी सुखदेव पवार (वय २५, रा. गोपाळवाडी, ता. जि. धाराशिव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ही घटना १३ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ९:३० ते ११:३० च्या सुमारास घडली. लक्ष्मी आणि त्यांची बहीण राणी या दोघी शिंगोली शिवारातील गट नंबर २८० मध्ये शेतातील स्प्रिंकलरच्या तोट्या बदलण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी तेथे दबा धरून बसलेल्या आरोपींनी त्यांना अचानक गाठले.
आरोपींनी दोघींना जातिवाचक शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. विरोध केला असता, आरोपींनी लाथाबुक्क्यांनी, काठीने आणि दगडाने बेदम मारहाण केली. यावेळी आरोपींनी फिर्यादीची बहीण राणी यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने बळजबरीने काढून घेतले आणि त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला.
आरोपींची नावे:
या प्रकरणी लक्ष्मी पवार यांनी १७ फेब्रुवारी २०२६ रोजी दिलेल्या फिर्यादीवरून खालील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे:
१. बापू भैरू मिसाळ (रा. गोपाळवाडी) २. अरुण चव्हाण (रा. गोपाळवाडी) ३. वाघ्या विकास होगले (रा. गोपाळवाडी) ४. संतोष थोरवे (रा. गोपाळवाडी) ५. अनंता मारुती धोंगडे (रा. वाघोली) ६. इतर दोन अनोळखी इसम
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन येरमाळा पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९, ११८(१), ११५(२), ११९(१)(२), ७४, ७५, ७६, ७८, ३५२, १८९(२), १९०, १९१(२), १९१(३) सह अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (ॲट्रासिटी ॲक्ट) कलम ३(१)(आर), ३(१)(एस), ३(१)(डब्ल्यु) (आय), ३(१)(डब्ल्यु) (आयआय), ३(2)(व्हीए) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.




