धाराशिव : तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यासंदर्भात स्थानिकांच्या आक्षेपांवर सुनावणी न घेणे हा न्यायालयीन प्रक्रियेचा भंग आहे, अशा शब्दांत पालकमंत्री तथा तुळजापूर विकास आराखडा समितीचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी नाराजी व्यक्त केली. धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात आज (१५ ऑगस्ट) रोजी पालकमंत्री आणि तुळजापूरच्या स्थानिक नागरिकांमध्ये आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत नागरिकांनी आराखड्याविषयी तीव्र आक्षेप नोंदवल्याने आता पुढील बैठक १७ सप्टेंबर रोजी होणार आहे.
स्थानिक नागरिकांनी तक्रार केली की, विकास आराखड्याचे सादरीकरण (प्रेझेंटेशन) त्यांना कधीही दाखवण्यात आले नाही. यावर पालकमंत्री सरनाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने पुढील आठवड्यात बैठक घेऊन सादरीकरण दाखवण्याचे निर्देश दिले. तसेच, या आराखड्याला किती लोकांची संमती आहे, याची लेखी माहिती सादर करण्यासही सांगितले. “स्थानिकांच्या घरांवर बुलडोझर फिरवला जाणार नाही,” असा विश्वासही त्यांनी यावेळी नागरिकांना दिला.
‘आणखी किती जागा द्यायची?’ – नागरिकांचा सवाल
बैठकीत नागरिकांनी आपली बाजू मांडताना सांगितले की, यापूर्वी १९८८ आणि २०१२ मध्ये मंदिर विकासासाठी जागा देण्यात आली आहे आणि त्यावेळी कोणताही विरोध झाला नव्हता. मात्र, आता आणखी किती जागा द्यायची, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. मंदिराजवळील अनेक घरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील असून त्यांना ‘हेरिटेज’ दर्जा देण्याची मागणीही नागरिकांनी केली.
एकाच वास्तुविशारदावर संशय आणि प्रशासकीय दिरंगाई
या संपूर्ण आराखड्यासाठी केवळ हेमंत पाटील हेच वास्तुविशारद (आर्किटेक्ट) का आहेत आणि ते आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे ऐकत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला. पहिल्या आराखड्यात नसलेली घरे दुसऱ्या आणि तिसऱ्या आराखड्यात कशी समाविष्ट झाली, याबद्दलही नागरिकांनी संशय व्यक्त केला.
विशेष म्हणजे, पालकमंत्र्यांसोबत बैठक होणार असल्याची पूर्वकल्पना असूनही बाधित नागरिकांना प्रशासनाकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही. याबाबत तहसीलदार समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत, त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आता सर्वांचे लक्ष १७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या पुढील बैठकीकडे लागले आहे. या बैठकीत प्रशासनाकडून तोडगा निघणार की नागरिकांचा विरोध कायम राहणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.