तुळजापूर: तालुक्यातील १०८ ग्रामपंचायतींच्या आगामी २०२५ ते २०३० या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सरपंच पदाचे आरक्षण आज येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्पोर्ट हॉलमध्ये जाहीर करण्यात आले. उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पार पडला.
या आरक्षणानुसार, तालुक्यातील सर्वाधिक ६० ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पद सर्वसाधारण (खुले) प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. २९ ग्रामपंचायतींमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी), १८ ग्रामपंचायतींमध्ये अनुसूचित जाती (SC) आणि एका ग्रामपंचायतीमध्ये अनुसूचित जमाती (ST) साठी सरपंच पद राखीव ठेवण्यात आले आहे. नियमानुसार, एकूण सरपंच पदांपैकी ५० टक्के पदे महिलांसाठी आरक्षित करण्यात आली आहेत, जी संबंधित प्रवर्गांमध्ये विभागली गेली आहेत.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी १९९५ पासून लागू असलेल्या आरक्षण पद्धतीची माहिती दिली आणि त्या प्रक्रियेनुसार आरक्षण जाहीर केले. काही अनिर्णित ठिकाणी चिठ्ठ्या टाकून आरक्षण निश्चित करण्यात आले.
तालुक्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या सिंदफळ, मसला, काटगाव, जळकोट, इटकळ, अणदूर या ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पद ‘सर्वसाधारण स्त्री’साठी आरक्षित झाले आहे.
या आरक्षण सोडतीसाठी ग्रामीण भागातून नागरिक, कार्यकर्ते आणि विविध पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या मनाप्रमाणे आरक्षण जाहीर झाल्यानंतर काहींनी जल्लोष केला, तर काहींच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्टपणे दिसत होती.
यावेळी उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदारांव्यतिरिक्त मंगेश वाघोलीकर, प्रशांत मलगे, दत्ता नन्नवरे, सुनील हत्तीकर आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.