तुळजापूर – ‘माझ्या पत्नीला तू घेऊन गेला होतास, तिला परत आणून का सोडले नाही?’ या कारणावरून एका तरुणावर लोखंडी चाकूने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना तुळजापुरात घडली आहे. पीडित तरुणाला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली आहे.
ही घटना सोमवारी, २ जून २०२५ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास तुळजापूर घाटाखालील पुलाजवळ घडली. याप्रकरणी पीडित तरुणाच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी बालाजी सुभाष शिंदे (रा. सिंदफळ, ता. तुळजापूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी नाना उत्तम कोकडे (रा. घाटशिळ रोड, बीडकर तलाव, तुळजापूर) याने त्यांना घाटाखालील पुलाजवळ अडवले.
‘तू माझ्या बायकोला नेले होतेस आणि परत आणून का सोडले नाही,’ असे म्हणत आरोपी कोकडेने फिर्यादी शिंदे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर वाद वाढला असता आरोपीने लाथाबुक्यांनी मारहाण केली आणि जवळ असलेल्या लोखंडी चाकूने हल्ला करून शिंदे यांना गंभीर जखमी केले. तसेच, ‘तुला जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
या घटनेनंतर बालाजी शिंदे यांनी त्याच दिवशी तामलवाडी पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी नाना कोकडे विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(२) (गंभीर दुखापत करणे), ३५२ (मारहाण), आणि ३५१(३) (जीवे मारण्याची धमकी) अन्वये गुन्हा नोंदवला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.