धाराशिव – “तुळजापूरचे आमदार हे पालथ्या पायाचे असून कायम चांगल्या कामात खीळ घालण्याचेच उद्योग करत आहेत,” अशी घणाघाती टीका खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पुन्हा एकदा आमदार राणा पाटील यांच्यावर केली आहे. धाराशिव जिल्ह्यातील विकासकामांना अचानक स्थगिती देण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर ओमराजे यांनी सरकारवर आणि राणा पाटील यांच्यावर नाराजी व्यक्त करत ठामपणे जबाबदार धरले आहे.
“महायुतीतील अंतर्गत भांडणं – विशेषतः पालकमंत्रीपदाच्या बदल्यावरून सुरू झालेल्या वादाचे सावट जिल्ह्यातील विकासावर पडत आहे. मुख्यमंत्री एकीकडे विकासाची भाषा करतात, आणि दुसरीकडे त्याच सरकारमधील आमदारामुळे कामांना स्थगिती मिळते. मग या सगळ्याचा फटका जनतेला का?” असा सवाल ओमराजेंनी केला.
ओमराजेंनी स्पष्टपणे सांगितले की, तुळजापूरचे आमदार राणा पाटील हे विकासकामांमध्ये अडथळा आणण्याच्या भूमिकेतच कायम राहिले आहेत. “कधी चांगले काम केले नाही आणि इतरांनी काही चांगले करायचे म्हटले की लगेच खोडा,” असा आरोप करत ओमराजेंनी राजकीय आरोपांच्या फटकार्या झाडल्या.
या टीकेमुळे पुन्हा एकदा तुळजापूरचे आमदार आणि धाराशिवचे खासदार यांच्यातील वादाचे वारे जोर धरू लागले आहेत.