धाराशिव: तुळजापूर आणि नळदुर्ग नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार यादीत मोठ्या प्रमाणात घोळ असून, एका सत्ताधारी पक्षाने प्रशासनाला हाताशी धरून केलेला राजकीय डाव आहे, असा गंभीर आरोप शिवसेनेचे (एकनाथ शिंदे गट ) जिल्हा सहसंपर्कप्रमुख अमराजे कदम यांनी केला आहे.याद्यांमध्ये हजारो मतदारांची नावे चुकीच्या प्रभागात टाकण्यात आली असून, अनेक मयत व्यक्तींची नावे यादीत कायम आहेत, तर जिवंत मतदार गायब झाले आहेत. याविरोधात कदम यांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे शुक्रवारी (दि. १७ ऑक्टोबर २०२५) लेखी तक्रार दाखल केली असून, मतदार याद्या तात्काळ दुरुस्त न केल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.
जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात अमराजे कदम यांनी म्हटले आहे की, तुळजापूर आणि नळदुर्ग नगरपालिकेच्या २०२५ च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीत गंभीर त्रुटी आहेत. अंदाजे २५०० ते ३००० मतदारांची नावे त्यांच्या रहिवासी प्रभागाऐवजी दुसऱ्याच प्रभागात समाविष्ट करण्यात आली आहेत. इतकेच नाही, तर तुळजापूर शहरातील काही मतदारांची नावे नळदुर्ग नगर परिषदेच्या यादीत घुसडण्यात आली आहेत.
निवेदनात नमूद केलेल्या प्रमुख त्रुटी:
- एकाच कुटुंबातील सदस्यांची नावे दोन-तीन वेगवेगळ्या प्रभागांमध्ये विभागली गेली आहेत.
- सुमारे १० ते १५ वर्षांपूर्वी मरण पावलेल्या व्यक्तींची नावे मतदार यादीतून वगळलेली नाहीत.
- नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या यादीतील अनेक पात्र मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत.
- प्रभाग क्र. ७ मधील एका मतदाराचे नाव एका प्रभागात, तर त्यांच्या पत्नी आणि मुलीची नावे प्रभाग क्र. १० आणि ११ मध्ये टाकण्यात आली आहेत.
- अनेक प्रभागांतील मतदारांना दुसऱ्याच प्रभागात समाविष्ट करून गोंधळ निर्माण केला आहे.
हा सर्व प्रकार सत्ताधारी राजकीय पक्षाने प्रशासकीय यंत्रणेचा वापर करून हेतुपुरस्सर केल्याचा संशय शिवसेनेने व्यक्त केला आहे. चुकीच्या पद्धतीने तयार झालेल्या या सदोष मतदार याद्यांमुळे निवडणुकीत गोंधळ निर्माण होऊन नागरिकांच्या मतदानाच्या हक्कावर गदा येऊ शकते, असेही निवेदनात म्हटले आहे.
त्यामुळे प्रशासनाने या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून मतदार यादीतील त्रुटी तात्काळ दूर कराव्यात, चुकीची नावे वगळून पात्र मतदारांचा समावेश करावा आणि अचूक मतदार यादी प्रसिद्ध करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. अन्यथा, या विरोधात न्यायालयात दाद मागितली जाईल, असा इशाराही अमराजे कदम यांनी दिला आहे.
कदम यांनी भाजपचे नाव न घेता घरचा आहेर दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.या निवेदनाची प्रत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनाही माहितीसाठी सादर करण्यात आली आहे.







