धाराशिव – महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी राज्य सरकारने आता २१०० कोटी रुपयांचा अंतिम विकास आराखडा प्रशासकीय मान्यतेसाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडे सादर केला आहे. छत्रपती संभाजी नगर येथील मंत्रिमंडळ बैठकीत यापूर्वी १३२८ कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला होता.
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, तुळजाभवानी देवीचे तीर्थक्षेत्र वैश्विक दर्जाचे करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. जगभरातील भाविक तुळजापुरात यावेत, त्यातून अर्थकारणाला बळकटी मिळावी आणि रोजगार निर्मिती व्हावी हा त्यामागील उद्देश आहे.
या अंतिम आराखड्यात मुख्य दर्शन मंडप, घाटशिळ व हडको येथे भाविक सुविधा केंद्र, शहरात आकर्षक कमान, आधुनिक उद्यान, वृध्द व दिव्यांगाकरिता लिफ्ट, ट्रॅव्हलेटर आदी सुविधांचा समावेश आहे. भूसंपादनासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, प्रचलित दराच्या कैकपटीने जमिनीचे भूसंपादन केले जाणार आहे.
नागरिकांच्या सूचना आणि हरकती मागवून त्यांचा आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे प्रस्तावित आराखड्याची किंमत १३२८ कोटींवरून २१०० कोटी झाली आहे, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
सर्वांना विश्वासात घेऊन आणि जमिनीचा चांगला मोबदला देऊन आई तुळजाभवानी देवीचे तीर्थक्षेत्र जागतिक दर्जाचे करण्याचा प्रयत्न असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.
भूसंपादनासाठी प्रचलित दराच्या कैकपट मावेजा
तुळजापूर शहरातील नागरिक आणि पुजारी बांधवांना विश्वासात घेऊन भूसंपादन प्रक्रिया राबवली जाणार आहे. प्रचलित दाराच्या कैकपटीने विकास आराखड्यासाठी जमिनीचे भूसंपादन केले जाणार आहे. त्यासाठी सादर करण्यात आलेल्या या अंतिम विकास आराखड्यात तब्बल ५०० कोटी रुपयांची तरतुद केवळ भूसंपादन प्रक्रियेसाठी करण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांची जागा तीर्थक्षेत्र तुळजापूरच्या विकासासाठी संपादित केली जाणार आहे त्यांना समाधानकारक मावेजा मिळणार आहे. सर्वांच्या सहमतीने आणि सर्वांना विश्वासात घेऊन, तसेच जमिनीचा चांगला मोबदला देऊन आई तुळजाभवानी देवीचे तीर्थक्षेत्र जागतिक दर्जाचे करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.
दर्शन मंडपात विविध सुविधा
तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये मुख्य दर्शन मंडप व तेथील अनुषंगिक सुविधा, घाटशिळ व हडको येथे भाविक सुविधा केंद्र, शहरात व शहराच्या प्रमुख रस्त्यावरील प्रवेशद्वारावर आकर्षक कमान, वृंदावन गार्डनप्रमाणे आधुनिक उद्यान, वृध्द व दिव्यांगाकरिता लिफ्ट, ट्रॅव्हलेटर आदी बाबींचा अंतर्भाव करण्यात आला आहे. तसेच विकासकामांसाठी आवश्यक भूसंपादनाकरिता देखील निधीची तरतूद ठेवण्यात आली आहे. भूसंपादन व शासकीय करापोटी आवश्यक असणारे शुल्क तसेच विकासकामांसाठी लागणारा निधी असा एकूण दोन हजार शंभर कोटी रुपयांचा अंतिम आराखडा प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे.