तुळजापूर : संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात एक मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील प्रमुख फरार आरोपी आणि तुळजापूरच्या माजी नगराध्यक्षा अर्चना गंगणे यांचे पती, पिटू उर्फ विनोद गंगणे, यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. पोलिसांच्या ढिसाळ कारभारामुळे आणि सरकारी वकिलांनी बाजू न मांडल्याने गंगणे यांना हा दिलासा मिळाल्याचे दिसून येत आहे, ज्यामुळे तपास यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
काय आहे प्रकरण?
या वर्षी १४ फेब्रुवारी २०२५ रोजी तामलवाडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या या गुन्ह्यात एकूण ३७ जणांना आरोपी करण्यात आले आहे. आतापर्यंत पोलिसांनी १९ आरोपींना अटक केली असून, १८ जण अजूनही फरार आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी जिल्हा व सत्र न्यायालयात तब्बल १० हजार पानांचे दोषारोपपत्र देखील सादर केले आहे.
असा मिळाला अंतरिम जामीन
फरार आरोपी विनोद गंगणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. धक्कादायक बाब म्हणजे, सुनावणीदरम्यान पोलिसांनी आपले म्हणणे सादर केले नाही आणि सरकारी वकिलांनी देखील कोणताही युक्तिवाद केला नाही. याच मुद्द्यावर बोट ठेवत, तसेच गंगणे यांच्या वकिलांनी मांडलेल्या अजब युक्तिवादामुळे न्यायाधीश श्रीमती टी. जी. मिटकरी यांनी गंगणे यांना अंतरिम दिलासा दिला.
गंगणे यांच्या वकिलांनी न्यायालयात बाजू मांडताना सांगितले की, “गंगणे पूर्वी ड्रग्ज सेवन करत होते, मात्र आता त्यांनी ते सोडल्यामुळे त्यांना सतत खोकल्याचा त्रास होत आहे.” याशिवाय, पोलिसांनी यापूर्वीच्या एका अहवालात गंगणे यांनी तपासात सहकार्य केल्याचे नमूद केले होते. या सर्व बाबी विचारात घेऊन न्यायालयाने गंगणे यांना अंतरिम जामीन मंजूर केला. पुणे येथील ऍड. व्ही. व्ही. दुशिंग आणि ऍड. अंगद पवार यांनी गंगणे यांची बाजू मांडली.
अट कायम, धाकधूक वाढली
जरी गंगणे यांना अंतरिम जामीन मिळाला असला तरी, न्यायालयाने त्यांना एका महत्त्वाच्या अटीवर हा दिलासा दिला आहे. जामीन अर्जावरील अंतिम सुनावणीच्या वेळी विनोद गंगणे यांना स्वतः न्यायालयात हजर राहावे लागणार आहे. त्यामुळे गंगणे यांची धाकधूक कायम आहे. पुढील सुनावणी ६ जून रोजी हॊणार आहे.
या प्रकरणात आतापर्यंत अनेक आरोपींचे जामीन अर्ज फेटाळण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत एका प्रमुख आणि फरार आरोपीला जामीन मिळणे, तेही पोलिसांच्या आणि सरकारी वकिलांच्या अनुपस्थितीमुळे, या प्रकरणाला एक नवीन आणि अनपेक्षित वळण देणारे ठरले आहे. या घडामोडीमुळे प्रकरणाच्या भविष्यावर आणि तपासाच्या दिशेवर काय परिणाम होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.