वाशी – सततच्या छेडछाडीला आणि बदनामीच्या धमकीला कंटाळून एका २२ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना वाशी तालुक्यातील हातोला येथे घडली आहे. याप्रकरणी मयत विवाहितेच्या सासऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एका तरुणाविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि लैंगिक छळ प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरेखा संदीप खवले (वय २२, रा. हातोला) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेखा यांनी १९ जून रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास गावातीलच एका उसाच्या शेतात गळफास घेऊन आपले जीवन संपवले.
याप्रकरणी मयताचे सासरे संपत पांडुरंग खवले (वय ४९) यांनी २० जून रोजी वाशी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, गावातीलच आरोपी शंतनु नवनाथ खवले हा सुरेखा यांची नेहमी छेड काढत होता. तो त्यांना मानसिक त्रास देऊन शरीरसुखाची मागणी करत असे. तसेच, याबाबत कोणाला काही सांगितल्यास गावात बदनामी करण्याची धमकीही त्याने दिली होती.
या सततच्या त्रासाला कंटाळूनच सुरेखा यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दिलेल्या तक्रारीवरून वाशी पोलिसांनी आरोपी शंतनु खवले याच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ७८(२) (लैंगिक छळ) आणि १०८ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.