तुळजापूर : येणाऱ्या ‘धोंड्या’च्या महिन्यासाठी माहेरहून पाच तोळे सोने घेऊन ये, अन्यथा तुला घरात घेणार नाही व पतीचे दुसरे लग्न लावून देऊ, अशी धमकी देत केलेल्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून एका १९ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना तुळजापूर येथील विवेकानंदनगरमध्ये घडली. नम्रता शुभम कदम (वय १९, मूळ रा. शेकापूर, ता. जि. धाराशिव) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी पतीसह पाच जणांवर तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत नम्रता हिचा विवाह शेकापूर येथील शुभम कदम याच्याशी झाला होता. आगामी धोंड्याच्या महिन्यानिमित्त नम्रताने तिच्या माहेरहून पाच तोळे सोने घेऊन यावे, अशी मागणी सासरच्या मंडळींनी केली होती. जर सोने आणले नाही, तर ‘तुला घरात घेणार नाही आणि शुभमचे दुसरे लग्न लावून देऊ’, अशी धमकी तिला सातत्याने दिली जात होती. याच कारणावरून तिला मारहाण करून तिचा अतोनात शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला.
सासरच्या या सततच्या जाचाला आणि त्रासाला कंटाळून नम्रताने २४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी पावणेबारा वाजेच्या सुमारास तुळजापूर येथील विवेकानंदनगरमध्ये गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणी नीता गणेश गरड (वय ४०, रा. विवेकानंद नगर, तुळजापूर) यांनी २७ एप्रिल रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी खालील पाच आरोपींवर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०८, ८५, ११५(२), ३५२ आणि ३५१(३) अन्वये गुन्हा नोंदवला आहे:
-
शुभम मोहन कदम (पती, रा. शेकापूर, जि. धाराशिव)
-
जयश्री मोहन कदम (रा. शेकापूर, जि. धाराशिव)
-
अंजली अशोक यादव (रा. अमृतवाडी)
-
दिपाली संतोष सुरवसे (रा. बार्शी, ता. बार्शी)
-
सोनाली बालाजी मोहिते (रा. सांजा, ता. जि. धाराशिव)
या घटनेचा पुढील तपास तुळजापूर पोलीस करत आहेत. माहेरच्या लोकांवर या घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला असून, आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.







