धाराशिव – कावलदरा रोड रॉबरी प्रकरणात आता एक नवी आणि महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आज पहाटे राष्ट्रीय महामार्गावर प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीतील चार आरोपींना जेरबंद करण्यात आले असून, याचे खरे श्रेय महामार्ग पोलिसांच्या (Highway Police) दक्षतेला जाते. केवळ सीटबेल्ट न घातल्यामुळे येडशी टोलनाक्यावर एका स्कॉर्पिओ गाडीला थांबवले असता, हा प्रकार उघडकीस आला. मात्र, या कारवाईत पोलिसांना गुंगारा देऊन तीन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले असून, कारवाईच्या श्रेयावरून महामार्ग पोलीस आणि धाराशिव ग्रामीण पोलीस यांच्यात मतभेद असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
कुटुंबाला मारहाण करून लाखोंचा ऐवज लुटला
देवदर्शनासाठी तुळजापूरकडे जाणाऱ्या नाशिकच्या कुटुंबाला धाराशिवजवळ धुळे-सोलापूर महामार्गावर (NH 52) अडवून शस्त्रांचा धाक दाखवून लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुरुवारी (दि. १० एप्रिल २०२५) पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास कावलदरा गावाजवळील पुलावर हा प्रकार घडला. या घटनेत एकूण १ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे.
याप्रकरणी विलास कैलासवीर गोसावी (वय ४२, रा. देवगाव, ता. निफाड, जि. नाशिक) यांनी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, विलास गोसावी हे आपल्या कुटुंबासोबत कारने (क्र. एमएच ४८ एसी ४६१०) तुळजापूर येथे देवदर्शनासाठी जात होते. पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास कावलदरा गावाजवळील पुलावर अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या कारसमोर अचानक जॅकसारखी जड वस्तू फेकली. त्यामुळे कारचा गिअर बॉक्स तुटून गाडी बंद पडली.
फिर्यादी आणि त्यांचे कुटुंबीय मदतीसाठी कारमधून खाली उतरताच, दबा धरून बसलेल्या आठ अनोळखी इसमांनी त्यांना घेरले. चोरट्यांनी फिर्यादी आणि साक्षीदारांना मारहाण केली, चाकूचा धाक दाखवून त्यांच्याजवळील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम हिसकावून घेतली.
याच टोळक्याने काही वेळापूर्वी तुळजापूरकडून धाराशिवकडे जाणाऱ्या दुसऱ्या एका कारला अडवून त्यातील प्रवाशांकडून लॅपटॉप आणि मोबाईल असा मुद्देमाल चोरून नेल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. दोन्ही घटनांमिळून चोरट्यांनी एकूण १ लाख ६८ हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला.
विलास गोसावी यांच्या फिर्यादीवरून धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात आठ अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१०(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
असा लागला छडा:
महामार्ग पोलीस मदत केंद्र, येडशी येथील अधिकारी व अंमलदार (पोलीस हवालदार खटके (ब.नं. 255), खराडे (1159), उकिर्डे (758), कोळी (1225), पोलीस नाईक भिसे (981), पोलीस शिपाई हरभरे (1336), आलापुरे (272)) हे वरिष्ठांच्या आदेशानुसार आज सकाळी (१० एप्रिल) सुमारे ६ वाजता राष्ट्रीय महामार्ग ५२ वरील येडशी टोलनाक्यावर पेट्रोलिंग आणि मोटार वाहन कायद्याअंतर्गत कारवाई करत होते.
सकाळी अंदाजे ६:२५ वाजता, धाराशिवकडून तेरखेड्याच्या दिशेने जाणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या, काळ्या काचा असलेल्या स्कॉर्पिओ गाडीच्या (MH 14 BK 6787) चालकाने सीटबेल्ट लावला नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यांनी गाडी थांबवून चालकाकडे चौकशी सुरू केली असता, गाडीतील इतर इसमांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता, गाडीची मागील नंबर प्लेट बदललेली/त्यात फेरफार केलेला आढळला. अधिक तपासणीत गाडीमध्ये दरोडा टाकण्यासाठी व डिझेल चोरी करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य, पाच जिवंत बकरे आणि काही भरलेले व काही रिकामे डिझेलचे कॅन आढळून आले. गाडीतील इसमांना याबाबत विचारले असता, त्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत.
चौघे ताब्यात, तिघे फरार, श्रेय कुणाचे?
यावेळी गाडीत एकूण सात जण होते. परिस्थितीचा फायदा घेत, तीन जण पळून जाण्यात यशस्वी झाले, तर चार जणांना महामार्ग पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. महामार्ग पोलिसांनी तात्काळ घटनेची माहिती धाराशिव ग्रामीण पोलीस स्टेशन आणि येडशी दूरक्षेत्राला दिली. त्यानंतर API हाके, पोलीस हेड कॉन्स्टेबल शिंदे व इतर अंमलदार घटनास्थळी पोहोचले. महामार्ग पोलिसांनी पकडलेले चारही आरोपी, स्कॉर्पिओ वाहन, बकरे आणि इतर सर्व साहित्य रीतसर रिपोर्टसह पुढील तपासासाठी धाराशिव ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले.
पार्श्वभूमी आणि वादाची शक्यता:
पकडलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर यापूर्वी डिझेल चोरी आणि शेळी चोरीचे गुन्हे दाखल आहेत व ते मोहा पारधी पिढीवरील असल्याची प्राथमिक माहिती आहे. गाडीत सापडलेले बकरे आणि डिझेल चोरीचे साहित्य त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीकडे निर्देश करतात. हेच आरोपी आज पहाटे कावलदरा येथे झालेल्या दरोड्यात सामील असल्याचा प्रबळ संशय आहे.
एकीकडे महामार्ग पोलिसांच्या साध्या कर्तव्यपालनामुळे आणि दक्षतेमुळे (सीटबेल्ट कारवाई) या गुन्ह्याचा छडा लागला असताना, दुसरीकडे धाराशिव ग्रामीण पोलीस मात्र ही संपूर्ण कारवाई जणू काही आपलीच कर्तबगारी आहे, असे भासवत असल्याचा आरोप होत आहे. पळून गेलेल्या तीन आरोपींना पकडणे आणि महामार्गावरील प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करणे, हे पोलिसांसमोरील मोठे आव्हान आहे.
हे आहेत आरोपी
1 प्रकाश नाना पवार
2 शिवराम धनाजी पवार
3 सुनील धनाजी पवार
4 संतोष हरी कुमार
5 कुका काळे
6 पप्पू काळे
7 छगन शिंदेसर्व राहणार तेरखेडा
Video