नळदुर्ग: शहरातील रणे प्लॉटिंग परिसरातील अर्धवट अवस्थेत असलेल्या रस्त्याच्या कामामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या सात वर्षांपासून रखडलेल्या या कामामुळे ये-जा करताना नागरिक, लहान मुले आणि वयोवृद्धांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, अनेकदा पडून जखमी होण्याच्या घटना घडत आहेत. या प्रकाराविरोधात परिसरातील नागरिकांनी एकत्र येत नगर परिषदेला निवेदन देऊन काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे.
नागरिकांनी दिलेल्या निवेदनानुसार, रणे प्लॉटिंगमधील ख्वाजा नगर येथील रस्त्याचे काम २०१६ पासून रखडले होते. वारंवार मागणी आणि आंदोलनानंतर २०१८ मध्ये कामाला सुरुवात झाली, मात्र इमरान कुरेशी यांच्या घरासमोरील सुमारे ४० ते ५० मीटरचे काम अर्धवटच सोडण्यात आले. त्यामुळे या भागात गटार आणि नळाचे पाणी रस्त्यावर साचून तळ्याचे स्वरूप आले आहे. यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
विशेषतः या अर्धवट कामामुळे रस्ता निसरडा होऊन अनेक जण पडत आहेत. तीन दिवसांपूर्वी सिद्रा अफिजुर कुरेशी नावाची शाळकरी मुलगी याच रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याबाबत नगर परिषद प्रशासनाकडे वारंवार लेखी आणि तोंडी तक्रारी करूनही कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर, परिसरातील नागरिकांनी प्रशासनाला येत्या आठ दिवसांत अर्धवट राहिलेले रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी केली आहे. तसेच, अर्धवट काम सोडणाऱ्या गुत्तेदारावर आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या नगर परिषद कर्मचारी/अधिकार यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
जर आठ दिवसांत रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही, तर दिनांक ०५/०५/२०२५ रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून नगर परिषद कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, आमदार आणि पोलीस निरीक्षक यांनाही पाठवण्यात आल्या आहेत. प्रशासनाने नागरिकांच्या मागणीची दखल घेऊन तातडीने दिलासा द्यावा, अशी आर्त विनवणी नागरिकांनी केली आहे.