धाराशिव: मागील भांडणाच्या कारणावरून शहरातील छायादिप लॉन्सच्या आवारात एका १९ वर्षीय तरुणाला दोघांनी शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी आणि काचेच्या बिअरच्या बाटलीने बेदम मारहाण केली. या घटनेत तरुण जखमी झाला असून त्याला जिवे मारण्याची धमकीही देण्यात आली आहे. याप्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर संतोष आरण (वय १९ वर्षे, रा. बिलाल नगर, धाराशिव) हे फिर्यादी आहेत. आरोपी शांताराम नंदु लोंढे (रा. बिलाल नगर, धाराशिव) आणि रोहीत गायकवाड (रा. काका नगर, धाराशिव) यांनी दिनांक २०.०४.२०२५ रोजी रात्री पावणेदहाच्या सुमारास छायादिप लॉन्सच्या आवारात सागर आरण यांना मागील भांडणाच्या कारणावरून अडवले.
यावेळी आरोपींनी सागर आरण यांना शिवीगाळ केली. त्यानंतर लाथाबुक्यांनी आणि काचेच्या बिअरच्या बाटलीने बेदम मारहाण करून जखमी केले. तसेच त्यांना जिवे मारण्याची धमकीही दिली.
या घटनेनंतर जखमी सागर संतोष आरण यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरून दिनांक २१.०४.२०२५ रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात आरोपी शांताराम लोंढे आणि रोहीत गायकवाड यांच्याविरुद्ध भा.न्या.सं.कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२) सह ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास आनंदनगर पोलीस करत आहेत.