उमरगा: धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरालगतच्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५ बायपास रोडवर पहाटेच्या सुमारास एका प्रवाशाला तिघा अज्ञात आरोपींनी जबर मारहाण करून लुटल्याची गंभीर घटना घडली आहे. या घटनेत प्रवासी गंभीर जखमी झाला असून, आरोपींनी रोख रक्कम, मोबाईल फोन आणि महत्त्वाची कागदपत्रे लुटून नेली.
याबाबत आदिनाथ निवृत्ती गायकवाड (वय ५५, रा. जवळगाबेट, ता. उमरगा, जि. धाराशिव, ह.मु. समता नगर, मुबारकपुर, ता. निलंगा, जि. लातुर) यांनी उमरगा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आदिनाथ गायकवाड हे २३ एप्रिल २०२५ रोजी पहाटे ००.१५ वाजेच्या सुमारास उमरगा बायपासवरील चौरस्ता येथे वाहनाची वाट पाहत उभे होते.
यावेळी ॲटो रिक्षातून आलेल्या तीन अज्ञात इसमांनी त्यांना जबरदस्तीने ॲटोत बसवले आणि उमरगा बायपास रोडवरून कोरेगावाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर नेले. या ठिकाणी आरोपींनी आदिनाथ गायकवाड यांना लाथाबुक्यांनी, चाकुने व लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली, ज्यात ते गंभीर जखमी झाले.
मारहाण केल्यानंतर आरोपींनी फिर्यादीजवळील बॅगमधील रोख रक्कम ५,५५० रुपये, दोन मोबाईल फोन आणि काही कागदपत्रे जबरीने लुटून घेऊन पसार झाले. या घटनेनंतर आदिनाथ गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उमरगा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०९(४)(६), ११८(२), १३७(२) आणि ११५(२) अन्वये तीन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेने उमरगा परिसरात खळबळ उडाली असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. प्रवाशांनी रात्रीच्या वेळी किंवा पहाटेच्या सुमारास निर्जनस्थळी थांबताना सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.