नळदुर्ग – तुळजापूर तालुक्यातील सराटी शिवारात शेतजमिनीच्या वादातून एका महिलेला शिवीगाळ करून दगड व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या दिराने दिलेल्या तक्रारीवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सराटी येथील रहिवासी रवींद्र रामचंद्र कुंभार (वय ५०) यांनी शनिवारी, ३ मे २०२५ रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, ३ मे रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास सराटी शिवारातील शेत गट क्रमांक १७० मध्ये आरोपी कृष्णा नागनाथ कुंभार, ज्ञानेश्वर नागनाथ कुंभार आणि गजाबाई नागनाथ कुंभार (सर्व रा. सराटी, ता. तुळजापूर) यांनी संगनमत करून फिर्यादीची भावजय संगीता यांना शेतीच्या जुन्या वादाच्या कारणावरून शिवीगाळ केली.
त्यानंतर आरोपींनी संगीता यांना लाथाबुक्क्यांनी व दगडाने मारहाण करून जखमी केले आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
रवींद्र कुंभार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ३२९(३), ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.