वाशी – वाशी तालुक्यातील सोनेगाव येथे गाडी लावण्याच्या आणि रस्त्यावरून येण्या-जाण्याच्या किरकोळ कारणावरून एका ३२ वर्षीय व्यक्तीला पाच जणांनी मिळून मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीवरून पाच आरोपींविरुद्ध वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी हरीचंद्र मोहन कोळकर (वय ३२, रा. सोनेगाव, ता. वाशी) हे ३ मे २०२५ रोजी सकाळी सुमारे ६ वाजता सोनेगाव येथील हनुमंत सुकाळे यांच्या शेताजवळून पारा रोडने जात होते. यावेळी आरोपी अमोल दत्तु सुरवसे, समाधान दत्तु सुरवसे, दत्तु बाबुराव सुरवसे, सुनिता दत्तु सुरवसे आणि अन्य एक अनोळखी इसम (सर्व रा. सोनेगाव) यांनी फिर्यादीस गाडी लावण्याच्या व रस्त्याने येण्याच्या कारणावरून अडवले.
आरोपींनी गैरकायदेशीर जमाव जमवून फिर्यादी हरीचंद्र कोळकर यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांना लाथाबुक्क्यांनी, दगडांनी, काठीने आणि तेलाच्या पत्र्याच्या डब्यांनी मारहाण करून जखमी केले. दरम्यान, भांडण सोडवण्यासाठी फिर्यादीचे नातेवाईक पुढे आले असता, आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ करत मारहाण केली.
या घटनेनंतर हरीचंद्र कोळकर यांनी ४ मे २०२५ रोजी वाशी पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अमोल सुरवसे, समाधान सुरवसे, दत्तु सुरवसे, सुनिता सुरवसे आणि एका अनोळखी इसमाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१) (गैरकायदेशीर जमाव जमवणे), ३५२ (मारहाण करणे), १८९(२), १९१(२), १९० अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.