धाराशिव: धाराशिव शहरातील रस्त्यांच्या कामावरून राणा पाटील यांच्यावर झालेल्या आरोपांना आता प्रत्युत्तर देण्यात आले आहे. “धाराशिव जिल्ह्यात टक्केवारी संस्कृतीचे जनक म्हणून तुमच्या नेत्यांची ओळख जनतेला चांगलीच माहीत आहे,” अशा शब्दांत अभय इंगळे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला आहे. सोमनाथ गुरव यांनी केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर इंगळे यांनी एक पत्रक प्रसिद्ध करून आपली भूमिका मांडली.
अभय इंगळे यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे की, “कोणाचा मामा, कोणाचा भाऊ सार्वजनिक बांधकाम, महावितरण, जलसंधारण, भुयारी गटार अशा विभागांतील कामात पार्टनरशीप करतात, थेट कामे करतात, कोण ठेकेदारांवर दबाव आणून स्वतःच्या क्रशरमधून खडी, वाळू घ्यायला लावतात, हे सर्वश्रुत आहे. इतकंच नव्हे तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब यांनी सुद्धा तुमच्या नेत्यांना टक्केवारी बाबत जाहीर प्रशस्तीपत्र दिलेलं आहे.”
इंगळे यांनी १४० कोटींच्या कामांमध्ये टक्केवारी मिळावी म्हणूनच आंदोलन सुरू झाल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, “नगरसेवक असताना तुम्ही केवळ गुत्तेदारी पुरते मर्यादित होता, त्यामुळे प्रशासन, धोरण, निविदा प्रक्रिया याबाबत अज्ञान असणं स्वाभाविक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट धोरणात्मक निर्णय घेतल्यामुळे नगरविकास विभागाच्या निविदा अधिक दराने मिळणार नाहीत, हे ठरलेलं असतानाही आंदोलनाचा फार्स केला गेला. परंतु सुज्ञ धाराशिवकरांना हे राजकारण कळून चुकलं आहे.”
महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या कार्यक्षमतेवरही इंगळे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “तुमच्या नेत्यांकडे अडीच वर्षे राज्याचे मुख्यमंत्रिपद असताना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील यांना निधी आणण्याचं शहाणपण सुचलं नाही. त्यांच्या अकार्यक्षमतेमुळेच राणा दादांना धाराशिवकडे लक्ष द्यावं लागत आहे. राणा दादा तुळजापूरबरोबर धाराशिवच्या विकासासाठी निधी आणतात, ते त्यांचं कर्तव्य म्हणून. यामुळे तुमचे नेते उघडे पडले आहेत. त्यांच्या चुका झाकण्यासाठीच हे तुमचं सगळं नाटक, स्टंटबाजी सुरू आहे,” असा दावा इंगळे यांनी केला.
रस्त्यांच्या कामाच्या दर्जावर बोलणाऱ्यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला देत इंगळे म्हणाले, “तुम्ही कितीही ‘स्वच्छतेचा आव’ आणला, तरी सिव्हिल हॉस्पिटलसमोर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात तुमचा आणि तुमच्या जवळच्या लोकांचा हिस्सा किती आहे, हे जनतेपासून लपलेलं नाही. कामाचा दर्जा इतका निकृष्ट की नागरिकांनीच काम बंद पाडलं. आणि आता तुम्हीच गुणवत्ता, विकासावर भाष्य करताय? ‘सौ चुहे खाकर बिल्ली चली हज को!’ ही म्हण इथे तंतोतंत लागू होते.”
धाराशिवची जनता सुज्ञ असून येणाऱ्या निवडणुकीत ती योग्य तो निर्णय घेईल, असा विश्वास व्यक्त करत इंगळे यांनी म्हटले आहे की, “येणाऱ्या निवडणुकीत जनता तुमचं खऱ्या अर्थाने मूल्यांकन करणार आणि तुम्हाला योग्य ती जागा दाखवणार, हे निश्चित आहे.”