महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या श्री तुळजाभवानी मातेच्या दरबारात काम करणे ही एक सेवा मानली जाते. मात्र, याच पवित्र ठिकाणी प्रशासकीय कामकाज सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांना अत्यंत अर्वाच्य आणि अश्लील भाषेत शिवीगाळ करण्याचा जो संतापजनक प्रकार घडला आहे, तो केवळ निंदनीयच नाही, तर सत्तेचा आणि पदाचा माज डोक्यात गेल्याचे विदारक उदाहरण आहे.
गुंडगिरीला वैतागून कर्मचाऱ्यांचे ‘काम बंद’ आंदोलन

डोली सुविधेसारख्या प्रशासकीय निर्णयावर विचारणा करण्याचा अधिकार सर्वांना आहे, मात्र त्यासाठी कोणती भाषा वापरावी याचे भान सुटले की त्याचे रूपांतर गुंडगिरीत होते. या घटनेचे तीव्र पडसाद आता मंदिर संस्थानमध्ये उमटू लागले आहेत. जनसंपर्क अधिकारी, सहाय्यक जनसंपर्क अधिकारी आणि खुद्द मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लक्ष्य करून वापरण्यात आलेल्या असंसदीय भाषेच्या निषेधार्थ सर्व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून ‘काम बंद’ आंदोलन पुकारले आहे. “आमच्या आणि आमच्या कुटुंबीयांच्या जीवितास धोका आहे,” अशी उद्विग्न भावना जेव्हा सरकारी कर्मचारी लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांसमोर व्यक्त करतात, तेव्हा परिस्थितीचे गांभीर्य प्रशासनाने ओळखायला हवे.
कोण आहेत हे विजय गंगणे?
या संपूर्ण प्रकरणात ज्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे, त्या विजय गंगणे यांच्या ‘ओळखी’ पाहिल्या तर या अरेरावीमागचे मूळ कारण लक्षात येते. मुळात हा विजय गंगणे आहे तरी कोण?
हे महाशय नगराध्यक्ष विनोद गंगणे यांचे बंधू आहेत.
नगरसेविका प्रियंका गंगणे यांचे ते पती आहेत.
इतकेच नव्हे तर, श्री तुळजाभवानी मंदिराचे महंत तुकोजी बुवा यांचेही ते बंधू आहेत.
स्वतःला समाजात आदरार्थी ‘सर’ म्हणून घेणाऱ्या या व्यक्तीची भाषा मात्र एखाद्या सराईत गुन्हेगारालाही लाजवणारी आहे. घरात राजकीय पदे आहेत, भावकीत मानाचे स्थान आहे, याचा अर्थ तुम्हाला सरकारी अधिकाऱ्यांना आई-बहिणीवरून अश्लील शिव्या देण्याचा परवाना मिळाला आहे का? पदाची आणि सत्तेची हवा डोक्यात गेल्यावर माणूस किती खालच्या पातळीवर जाऊ शकतो, हेच यातून सिद्ध होते.
प्रशासनाने राजकीय दबाव झुगारून कारवाई करावी!
तुळजापूर हे एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे. इथे येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी काही प्रशासकीय निर्णय घेणे अधिकाऱ्यांचे कर्तव्य असते. अशा अधिकाऱ्यांवर जर राजकीय नेत्यांचे नातेवाईक दबाव टाकत असतील आणि दहशत निर्माण करत असतील, तर प्रशासनाचा कणा मोडून पडेल.
तुळजापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला, तरी या प्रकरणात आता कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता कठोर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे. जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानच्या अध्यक्षांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची हीच वेळ आहे. सत्तेच्या मस्तीत बेभान झालेल्या अशा प्रवृत्तींना वेळीच ठेचले नाही, तर उद्या सामान्य माणसाला जगणे कठीण होईल. ‘धाराशिव लाइव्ह’ अशा गुंडगिरीचा तीव्र निषेध करत असून, जोपर्यंत या प्रकरणात ठोस कारवाई होत नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच राहील.






