स्थळ: भाजप कार्यालय, प्रतिष्ठान भवन, धाराशिव. / प्रसंग: कार्यकर्ता संवाद मेळावा. प्रमुख पाहुणे: कट्टर हिंदुत्वाचे फायरब्रँड नेते नितेश राणे आणि अनुपस्थितीतले आमदार राणाजगजितसिंह पाटील.
अहो, काय तो योगायोग… किंवा म्हणा धूर्त कावळ्याने अचूक हेरलेला धोक्याचा इशारा! शनिवारी धाराशिवच्या भाजप कार्यालयात जणू ‘निष्ठावंतांचा’ महामेळाच भरला होता. व्यासपीठावर संघाच्या मुशीतून तयार झालेले आणि भाजपच्या शिस्तीत वाढलेले एकाहून एक धुरंधर बसले होते. माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, ॲड. मिलिंद पाटील, जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी… यादी मोठी आहे. या सगळ्या निष्ठावंतांच्या मांदियाळीत, व्यासपीठावर एक खुर्ची मात्र आतुरतेने कोणाची तरी वाट पाहत होती. होय, ती खुर्ची होती जिल्ह्याचे एकमेव भाजप आमदार, आमचे लाडके ‘उपरे’ अर्थात राणा पाटील यांची!
पण राणादादा काही आलेच नाहीत. आता याला काय म्हणावं? ऐनवेळी ‘पुरोगामी’ कामाची आठवण झाली की राणेंच्या ‘कट्टर’ भाषणांचा ट्रेलर पाहूनच पोटात गोळा आला?
झाले असे की, नितेश राणे आले आणि अपेक्षेप्रमाणे त्यांनी हिंदुत्वाचा बार उडवून दिला. “सरकारी योजनांचा लाभ घेता, लाडक्या बहिणीच्या नावाखाली पैसे घेता आणि मतं मात्र भलतीकडेच देता? अशा लोकांच्या घरी भाजप कार्यकर्त्यांनी फिरकूही नये,” असा सणसणीत टोला त्यांनी लगावला. आता हे भाषण ऐकून उपस्थित निष्ठावंतांच्या तर कळ्याच खुलल्या. “व्वा! क्या बात है! हेच तर आम्हाला म्हणायचं होतं,” अशा नजरेने ते एकमेकांकडे पाहत सुखावत होते.
आणि नेमक्या याच क्षणी सगळ्यांच्या मनात एकच विचार आला असेल, “अरेरे! आपले राणादादा आज असायला हवे होते. त्यांची अवस्था काय बघण्यासारखी झाली असती!” विचार करा, एका बाजूला राष्ट्रवादीतून आलेली ‘सेक्युलर’ पार्श्वभूमी आणि दुसऱ्या बाजूला नितेश राणेंचा हा जहाल हिंदुत्ववादी हल्ला… राणादादांची अवस्था म्हणजे ‘इकडे आड तिकडे विहीर’ झाली असती. कॅमेरामनने अचूक त्यांच्या चेहऱ्यावर फोकस केला असता आणि तो ‘व्हायरल’ क्षण टिपला असता.
कदाचित हाच ‘व्हायरल’ होण्याचा धोका ओळखून राणादादांनी ‘वेळेवर काढता पाय’ घेण्याचा निर्णय घेतला असावा. “अहो, कशाला उगाच अवघड जागेचं दुखणं? राणेंचं भाषण सुरू असताना आपला चेहरा पाहण्यापेक्षा घरात बसून राहिलेले काय वाईट?” असा साधा-सोपा विचार त्यांनी केला असावा.
एकंदरीत, धाराशिव भाजपमधील ‘निष्ठावंत’ विरुद्ध ‘उपरे’ हा सामना सध्या रंगात आला आहे. शनिवारी झालेल्या या ‘कार्यकर्ता मेळाव्याने’ तर या सामन्यात आणखीच रंगत आणली आहे. एका बाजूला कट्टर हिंदुत्वाचा जयघोष करणारे निष्ठावंत, तर दुसऱ्या बाजूला ‘सबका साथ’ म्हणत आपली पुरोगामी प्रतिमा जपणारे राणादादा! आता या राजकीय सर्कशीत पुढचा अंक कोणता असेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तोपर्यंत, राणादादांच्या अनुपस्थितीची चर्चा मात्र जिल्ह्याच्या राजकारणात ‘चवीने’ केली जाईल, हे नक्की!