दिल्लीत NEET पेपरफुटीवरून विद्यार्थ्यांच्या भविष्याचा बाजार उठलाय. पोरं न्याय मागायला जंतर-मंतरवर गेली, तर त्यांना सरकारकडून ‘प्रसाद’ म्हणून संवादाऐवजी लाठ्या-काठ्या मिळाल्या. या दडपशाहीविरोधात धाराशिवमध्ये संताप उसळला. नागरिकांनी कँडल मार्च काढला, तर काँग्रेसने राहुल गांधींच्या अटकेचा निषेध करत रस्त्यावर उतरून राडा केला, पुतळे जाळले, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि अमित शहांचा राजीनामा मागितला. इथवर सगळं गंभीर आणि सीरियस होतं.
पण, या गंभीर वातावरणात हास्याची फोडणी दिली ती स्थानिक भाजपने!
मॅगीपेक्षाही फास्ट: भाजपचे ‘पाच मिनिटांचे’ आंदोलन!
काँग्रेसने आंदोलन केलं, मग आपण कसे मागे राहणार? या इर्ष्येने भाजपचे काही ‘मूठभर’ कार्यकर्ते थेट काँग्रेस भवनासमोर पोहोचले. बरं, आंदोलन किती वेळ चाललं? तर फक्त पाच मिनिटे! (दोन मिनिटांत मॅगी शिजते, तसा पाच मिनिटांत यांचा लोकशाहीचा पुळका उकळून खाली आला).
या झटपट आंदोलनाचं कारण काय? तर म्हणे, राहुल गांधींनी मोदींच्या घरासमोर आंदोलन करून ‘चुकीचा पायंडा’ पाडला आहे! म्हणजे बघा, इकडे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य खड्ड्यात गेले तरी चालेल, पण पंतप्रधानांच्या बंगल्यासमोरचा ‘पायंडा’ चुकता कामा नये, हा यांचा बाणा! जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे आणि प्रवक्ते ऍड. नितीन भोसले यांच्या या ‘पाच मिनिटांच्या ठिय्या’चे संपूर्ण शहरात नुसते हसू झाले.
खरा ‘क्लायमॅक्स’: आमदारांच्या चिरंजीवांची फेसबुक पोस्ट
तिकडे रस्त्यावर भाजपचे नेते स्वतःची फिरकी घेऊ देत असताना, इकडे खुद्द भाजप आमदार राणा पाटील यांचे चिरंजीव मेघ पाटील यांनी थेट सोशल मीडियावरच पक्षाचा ‘गेम’ केला!
दिल्लीतील लाठीचार्ज आणि दडपशाही पाहून या तरुण रक्ताची सटकली आणि त्यांनी फेसबुकवर थेट सवाल डागला –
“स्त्रिया आणि लहान मुलांना मारहाण करून तुमच्या नाजूक अहंकाराला बळ मिळतं का?”
बाबो! बाण थेट वर्मी लागला होता. हा ‘नाजूक अहंकार’ कोणाचा आणि टोला कोणाला लगावलाय, हे सांगायला कोणत्याही राजकीय विश्लेषकाची गरज नव्हती. सरळ सरळ ती भाजपच्या कार्यपद्धतीविरोधातली पोस्ट होती.

डॅमेज कंट्रोल आणि पिळलेले कान…
लेकाने थेट दिल्लीच्या ‘बॉस’ लोकांच्या नाजूक अहंकारावर बोट ठेवल्याचे पाहताच आमदार साहेबांच्या पायाखालची वाळू सरकली असणार. मग काय, तत्काळ लेकाचे ‘कान पिळले’ गेले आणि आदेश सुटले – “पोस्ट उडव!”
वडिलांच्या दणक्यानंतर मेघ पाटील यांनी ती पोस्ट घाईघाईने डिलीट केली. पण साहेब, हे डिजिटल युग आहे! पोस्ट डिलीट होण्याआधीच तिचे स्क्रीनशॉट वाऱ्यासारखे व्हायरल झाले आणि अनेकांच्या भुवया थेट केसांच्या रेषेपर्यंत उंचावल्या.
थोडक्यात सांगायचे तर…
काँग्रेसच्या आंदोलनाला ‘काटशह’ द्यायला गेलेल्या भाजपची अवस्था ‘इकडे आड आणि तिकडे विहीर’ अशी झाली. पाच मिनिटांच्या आंदोलनाने रस्त्यावर हसू झाले आणि आमदारांच्या लेकाने एका पोस्टमधून पक्षाची उरलीसुरली अब्रू वेशीवर टांगली!
आता धाराशिवच्या राजकीय वर्तुळात एकच प्रश्न विचारला जातोय… बापाने लेकाचे कान पिळले, की लेकाने एकाच पोस्टमधून संपूर्ण भाजपचेच कान पिळले?





