धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील आणि शहरातील विकासकामे सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणामुळे थांबली असल्याचा गंभीर आरोप धाराशिव शहर काँग्रेस कमिटीने केला आहे. यासंदर्भात शहर काँग्रेस अध्यक्ष अग्निवेश शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना एक निवेदन सादर केले असून, अनेक महत्त्वाच्या योजनांवरील स्थगिती तत्काळ उठवून कामे सुरू करण्याची मागणी केली आहे.
निवेदनानुसार, धाराशिव जिल्हा हा आकांक्षित जिल्हा असूनही, जिल्हा वार्षिक योजना २०२४-२५ चा निधी सत्ताधारी पक्षांमधील वादामुळे स्थगित करण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यातील विविध विकासकामे ठप्प झाली असून, ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
याव्यतिरिक्त, धाराशिव शहरासाठी नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर असलेला १४० कोटींचा निधीही राजकीय कुरघोडीमुळे अडकला आहे. या निधी अंतर्गत शहरातील ५९ प्रमुख रस्ते आणि नाल्यांची कामे होणार होती, ज्याची टेंडर प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. परिणामी, ही महत्त्वाची कामे गेली दीड वर्षांपासून रखडली असून, शहरातील नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
काँग्रेसने निवेदनात धाराशिव नगरपरिषदेतील अपुऱ्या कर्मचारी वर्गावरही बोट ठेवले आहे. अधिकारी आणि कर्मचारी कमी असल्याने नागरिकांच्या समस्या वेळेवर मार्गी लागत नाहीत, असेही नमूद करण्यात आले आहे.
काँग्रेस कमिटीच्या प्रमुख मागण्या:
- जिल्हा वार्षिक योजना २०२४-२५ च्या निधीवरील स्थगिती तात्काळ उठवण्यात यावी.
- नगरोत्थान योजनेतील १४० कोटी रुपयांच्या निधीची कामे त्वरित सुरू करावीत.
- नगरपरिषद, धाराशिव येथील विविध विभाग प्रमुख आणि कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तात्काळ भरावीत.
- धाराशिव नगरपरिषदेला वित्त आयोगाचा निधी वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्यावा.