धाराशिव: स्मार्टफोनच्या स्क्रीनवर चमकणारे आकडे… आणि त्या आकड्यांच्या मागे धावणारी ग्रामीण तरुणाई. एका क्लिकवर नशीब आजमावण्याचा हा खेळ आता जीवावर बेततोय. याला कुणी ‘काळ-पांढरं’ म्हणतंय, कुणी ऑनलाइन रमी. पण नाव काहीही असो, धाराशिव जिल्ह्यात या डिजिटल राक्षसाने आपलं खरं रूप दाखवायला सुरुवात केली आहे. एका हसत्याखेळत्या कुटुंबाला मृत्यूच्या खाईत लोटून आणि दुसऱ्या तरुणाला लाखोंचा गंडा घालून, या व्यसनाने ग्रामीण भागातील भीषण वास्तव समोर आणले आहे.
एका कुटुंबाची राखरांगोळी…
बावी गावचा लक्ष्मण जाधव… तीन वर्षांपूर्वी प्रेमविवाह करून संसार थाटलेला एक सामान्य तरुण. ट्रॅक्टर चालवून घर चालवणारे त्याचे हात कधी पत्त्यांच्या डिजिटल दुनियेत अडकले, हे त्यालाही कळलं नाही. ‘काळ-पांढरं’ नावाच्या या ऑनलाइन रमीच्या खेळाने त्याला असं काही जखडलं की, कर्ज फेडण्यासाठी वडिलोपार्जित जमीन गेली, राहतं घर गेलं.
डोक्यावर कर्जाचा डोंगर आणि मनात निराशेचा अंधार… या अंधारातच त्याने एक धक्कादायक पाऊल उचलले. आपल्या पत्नी, तेजस्विनी आणि दोन वर्षांच्या निष्पाप मुलाला विष देऊन त्याने स्वतःही गळफास लावून घेतला. एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. ज्या घरात कधीकाळी हसण्याचा आवाज घुमत होता, तिथे आता भयाण शांतता पसरली आहे. लक्ष्मणच्या आत्महत्येने केवळ एक कुटुंब संपले नाही, तर ऑनलाइन गेमिंगच्या व्यसनाचा क्रूर चेहरा उघड झाला आहे.
दुसरा बळी, फसवणुकीचा…
लक्ष्मणच्या चितेची आग विझते न विझते तोच, याच डिजिटल फसवणुकीचा दुसरा बळी समोर आला. कारी गावचा वैभव डोके. याने आयुष्य गमावलं नाही, पण आयुष्याची कमाई नक्कीच गमावली. रमीच्या याच मायाजालात त्याची तब्बल ७० लाख रुपयांची फसवणूक झाली.
‘सिस्टम’च अशा पद्धतीने बनवली आहे की तुम्ही जिंकूच शकत नाही, असा आरोप करत वैभवने आता सायबर पोलिसांकडे धाव घेतली आहे. माझे गेलेले पैसे परत मिळावेत आणि या फसव्या ॲप्सवर कारवाई व्हावी, अशी मागणी तो करत आहे. त्याचे पैसे परत मिळतील का, हा प्रश्न अनुत्तरित आहे. पण या घटनेने ऑनलाइन गेमिंगच्या नावाखाली चालणारा गोरखधंदा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणला आहे.
धोक्याची घंटा
ही केवळ दोन तरुणांची गोष्ट नाही. ही गोष्ट आहे ग्रामीण भागातल्या त्या प्रत्येक तरुणाची, जो झटपट पैशाच्या मृगजळामागे धावतोय. शेती आणि कष्टाला पर्याय म्हणून पाहिलेला हा ‘शॉर्टकट’ आता आयुष्यालाच ‘कट’ मारत आहे. धाराशिवमधील या दोन घटना म्हणजे केवळ एक धोक्याची घंटा आहे. वेळीच सावध न झाल्यास, हा डिजिटल राक्षस अजून किती जणांचे संसार उद्ध्वस्त करेल, हे सांगता येत नाही.
“ऑनलाईन रमी”चा विळखा – समाज, सरकार आणि आपण सारेच दोषी!
एका बाजूला ९३ वर्षांचे आजोबा आपल्या पत्नीसाठी दागिना घेण्यासाठी सोनाराकडे जातात, आणि त्यांच्या प्रेमळ कृतीमुळे संपूर्ण समाज हेलावून जातो. दुसऱ्या बाजूला आपल्या तरुण पिढीला ‘ऑनलाईन रमी’सारखे गेम अक्षरशः गिळंकृत करत आहेत. ही शोकांतिका आणि वास्तव समाजाच्या विवेकाला हादरवणारी आहे.
ऑनलाईन गेम्समुळे देशभरातील अनेक कुटुंबं उद्ध्वस्त होत आहेत. मुलांनी ऑनलाईन रमी खेळून घरातील पैसे उधळल्याच्या शेकडो घटना आजवर समोर आल्या आहेत. काही ठिकाणी आत्महत्येच्या घटनाही घडल्या आहेत.
या सगळ्यात सरकारची भूमिका आश्चर्यकारक आहे – “बंदी आणावी का, नाही का?” या संभ्रमात वर्ष जातात, पण ‘कमाई’ करणाऱ्या अॅप्सना थोपवण्याची जबाबदारी कोणीही उचलत नाही. शिक्षणव्यवस्था कोलमडली आहे, रोजगार नाही, आणि झटपट श्रीमंतीची स्वप्नं पाहणाऱ्या तरुणांचा ऑनलाईन रमीसारख्या खेळांकडे कल वाढतोच आहे.
हे थांबवायचं असेल, तर केवळ सरकारकडे पाहून चालणार नाही. समाज म्हणून, पालक म्हणून, आणि एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्यालाही आवाज उठवावा लागेल. कारण उद्या बातमीत ‘तो’ मुलगा दुसऱ्याच्या घरचा नसेल, आपल्या घरचाच निघेल!
- अभियंता प्रसाद पाटील – पुणे