धाराशिव: काय तो डोंगर, काय ती झाडी, काय ते ५०० किलोमीटरचं वॉकिंग! सगळं ओकेमध्ये पार करून टिपेश्वरचे ‘महाराज’ अर्थात आपला लाडका वाघ आता धाराशिव जिल्ह्याचा कायमचा रहिवासी झाल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. डिसेंबर २०२४ मध्ये आलेला हा ‘शाही पाहुणा’ आता परत जायचं नावच घेत नाहीये, उलट धाराशिवकरांच्या प्रेमात पडून इथेच ‘स्थायिक’ झाला आहे.
सुरुवातीला या पाहुण्याला परत पाठवण्यासाठी ताडोबाच्या जंगलातून खास ‘टायगर रिटर्न’ टीम दाखल झाली. दीड महिना जंगलात सफारी केली, कॅम्पिंग केलं, फोटो काढले आणि वाघाला ‘टाटा’ करून परत गेली. वाघ काही त्यांना सापडला नाही, उलट वाघानेच त्यांची चांगलीच ‘सफारी’ घडवली.
त्यानंतर पुण्याच्या हाय-टेक टीमने सूत्रे हाती घेतली. ड्रोन, कॅमेरे आणि न जाणे काय काय घेऊन आले. तब्बल तीन महिने मुक्काम ठोकला, पण वाघोबाने त्यांनाही ‘तुमचं तुम्ही बघा’ म्हणत दर्शन दिले नाही. अखेर कंटाळून पुण्याची टीमही ‘पुन्हा येईन’ न म्हणताच निघून गेली.
गेला महिनाभर वाघोबा गायब झाल्याने सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला होता. काहींना वाटले, “चला, कंटाळला वाटतं इथल्या वातावरणाला, गेला असेल परत.” पण सगळ्यांचे अंदाज चुकवत, खरिपाच्या पेरणीच्या ऐन मुहूर्तावर महाराज पुन्हा प्रकटले आहेत. तुळजापूर आणि धाराशिव तालुक्यातल्या गावांमध्ये शेतकऱ्यांना दर्शन देऊन त्यांनी आपल्या ‘अस्तित्वाची’ जाणीव करून दिली आहे.
आता शेतकरी मात्र डोक्याला हात लावून बसले आहेत. एकीकडे पेरणीची घाई आणि दुसरीकडे हा ‘बिनपगारी सुपरवायझर’ शेतात फिरतोय. काही जाणकारांनी “हा तो वाघ नाही, दुसरा आलाय,” अशी शंका उपस्थित केली होती. पण वनविभागाने “अहो, गैरसमज नको, हा तोच आपला जुना ‘हिरो’ आहे,” असं अधिकृतपणे जाहीर करून टाकलं आहे.
सध्या तरी परिस्थिती अशी आहे की, वाघ मजेत धाराशिव तालुक्यातील जागजी , सांगवी शिवारात मॉर्निंग वॉक करत आहे आणि शेतकरी “आता पेरणी करायची कशी?” या चिंतेत आहेत. एकूणच, टिपेश्वरचा हा वाघ आता धाराशिवचा ‘मानबिंदू’ बनला असून, त्याला पकडण्याचे प्रयत्न सोडून वनविभागाने त्याला ‘पर्यटन ब्रँड ॲम्बेसेडर’ घोषित करावं, अशी मागणी जोर धरू लागली आहे!