धाराशिव: शहराच्या गल्लीबोळात आणि जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सध्या माणसांचे नव्हे, तर मोकाट श्वानांचे राज्य असल्याचे चित्र आहे. रस्त्यांवर फिरताना जीव मुठीत धरून चालावे लागत असून, आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार दररोज तब्बल २२ नागरिक या श्वानदंशाचे बळी ठरत आहेत, ही भयावह परिस्थिती असतानाही प्रशासन मात्र कोणतीही ठोस कारवाई करताना दिसत नाही, त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र घबराट पसरली आहे.
जानेवारी २०२४ ते मे २०२५ या केवळ १७ महिन्यांच्या काळात जिल्ह्यात तब्बल ११,४४५ नागरिकांना श्वानांनी चावा घेतल्याची धक्कादायक नोंद आहे. तुळजापूर (२५१८), वाशी (२११९) आणि धाराशिव (१९९८) तालुक्यांमध्ये परिस्थिती सर्वात गंभीर असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते.
समस्येचे मूळ आणि प्रशासनाचा नाकर्तेपणा
शहरी भागांतील मटण आणि चिकनच्या दुकानांभोवती खाद्य सहज उपलब्ध होत असल्याने श्वानांचे थवेच्या थवे जमा होत आहेत. अनेक ठिकाणी कचरा उचलणाऱ्या घंटागाड्या वेळेवर येत नसल्याने नागरिक रस्त्यावर शिळे अन्न टाकतात, ज्यामुळे श्वानांची संख्या आणखी वाढत आहे.
विशेष म्हणजे, धाराशिव पालिकेने तीन वर्षांपूर्वी मोठ्या गाजावाजा करून श्वानांची निर्बीजीकरण मोहीम सुरू केली होती, मात्र ती अवघ्या तीन महिन्यांतच गुंडाळली गेली. त्यानंतर दोन वर्षांपूर्वी दोनदा ऑफलाइन आणि एकदा ऑनलाइन निविदा काढूनही एकाही एजन्सीने काम करण्यास रस दाखवला नाही. या प्रशासकीय उदासीनतेचा थेट परिणाम म्हणून आज श्वानांची संख्या अनियंत्रितपणे वाढली आहे.
नागरिकांचा आक्रोश आणि वेदना
“शासकीय रुग्णालयाच्या रस्त्यावरून संध्याकाळी चालणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे,” असे मत एका नागरिकाने व्यक्त केले. ते पुढे म्हणतात, “येथे श्वानांच्या झुंडी अनेकांचा चावा घेत आहेत, पालिकेने तातडीने निर्बीजीकरण करावे.”
दुचाकीस्वारांना तर रोजचाच थरार अनुभवावा लागतो. अंगावर धावून येणाऱ्या श्वानांमुळे अनेक अपघातही घडले आहेत, विद्यार्थी आणि वयोवृद्ध नागरिक सहजपणे त्यांचे लक्ष्य बनत आहेत. तांबरी परिसरातील नागरिक तर पाळीव श्वानांच्या त्रासाला इतके वैतागले आहेत की, त्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठून निवेदन दिले आहे.
एकीकडे श्वानदंशानंतर नागरिकांना लसीसाठी धावाधाव करावी लागत आहे , तर दुसरीकडे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दररोज ८ ते ९ नवीन रुग्ण दाखल होत आहेत. सध्या एक हजार लसींची खरेदी करण्यात आली असून, हा साठा केवळ दोन महिने पुरेल, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. शैलेंद्र चव्हाण यांनी दिली.
एकीकडे नागरिक दहशतीखाली जगत असताना, दुसरीकडे पालिकेचे स्वच्छता निरीक्षक गणेश महेर मात्र “स्वच्छतेसाठी घंटागाड्या वेळेवर सोडल्या जात आहेत,” असा दावा करत आहेत. प्रशासनाच्या या दाव्यांमधील आणि जमिनीवरील वास्तवातील तफावत पाहता, धाराशिवच्या नागरिकांना या मोकाट दहशतीपासून सुटका कधी मिळणार, हाच खरा प्रश्न आहे.