धाराशिव – येथील नगरपालिकेच्या मुख्याधिकारी वसुधा फड या वादग्रस्त पार्श्वभूमीवर दीर्घ रजेवर गेल्या असतानाच, त्यांचा पदभार सांभाळण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्याची त्याच दिवशी बदली झाल्याने धाराशिव पालिकेतील प्रशासकीय पेच वाढला आहे. या घटनेमुळे पालिकेतील १४० कोटींच्या रस्ते निविदेचा वाद आणि आगामी निवडणुकीच्या प्रभाग रचनेच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सोमवारी पालिका मुख्याधिकारी वसुधा फड दीर्घ रजेवर गेल्या. गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळ कार्यरत असलेल्या फड यांनी प्रथमच दीर्घ रजा घेतली आहे. पालिका निवडणुकीच्या तोंडावर होणारी प्रभाग रचना आणि १४० कोटी रुपयांच्या रस्ते कामाच्या निविदेवरून सुरू असलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या रजेमुळे मोठी चर्चा सुरू झाली आहे. या निविदेला अंदाजपत्रकीय किमतीनुसार मंजुरी मिळाल्याचे सांगितले जात असताना, दुसरीकडे पालकमंत्र्यांनी ही प्रक्रिया रद्द केल्याचे म्हटले होते. मात्र, याबाबत कोणतेही लेखी आदेश नसल्याने संपूर्ण प्रक्रियेत संभ्रम कायम आहे. फड या आजारपणामुळे रजेवर गेल्याचे अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले असले तरी, त्या बदलीसाठी प्रयत्नशील असल्याचीही चर्चा आहे.
फड यांच्या रजेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचा पदभार नगर प्रशासन विभागाचे जिल्हा सहआयुक्त अजितकुमार डोके पाटील यांच्याकडे सोपवला होता. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे ज्या दिवशी डोके यांच्याकडे पदभार येण्याची शक्यता होती, त्याच दिवशी, म्हणजेच २४ जून २०२५ रोजी, महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने एक आदेश काढून त्यांची बदली केली आहे.
शासनाच्या आदेशानुसार, धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयातील गट-ब संवर्गातील सहायक आयुक्त असलेले अजितकुमार डोके यांची प्रशासकीय कारणास्तव लातूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्याच पदावर रिक्त जागी बदली करण्यात आली आहे. त्यांना २४ जून २०२५ रोजी दुपारपासून कार्यमुक्त करण्यात आले असून , २५ जून २०२५ रोजी लातूर येथे रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
एकीकडे मुख्याधिकारी दीर्घ रजेवर आणि दुसरीकडे त्यांचा प्रभार घेण्यासाठी नियुक्त अधिकाऱ्याची त्याच दिवशी बदली, या दुहेरी योगायोगाने धाराशिव पालिकेच्या कारभारात मोठी प्रशासकीय पोकळी निर्माण झाली आहे. यामुळे पालिकेतील वादग्रस्त निविदा आणि इतर महत्त्वाच्या कामांचे भवितव्य काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.