तुळजापूर : येथील श्री तुळजाभवानी सैनिक शाळेत मोठ्या प्रमाणात आर्थिक भ्रष्टाचार होत असल्याचा आणि एका विद्यार्थ्याला अमानुष मारहाण झाल्याचा गंभीर आरोप शिवसेनेने केला आहे. या प्रकरणी तातडीने स्वतंत्र चौकशी समिती नेमून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल शिवाजीराव जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जाधव यांनी २५ जून २०२५ रोजी धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांकडून वस्तू व सुविधा पुरवण्याच्या नावाखाली ३५,०००, १५,००० आणि ८,५०० रुपयांसारख्या मोठ्या रकमा अधिकृत पावतीशिवाय वसूल केल्या जात आहेत. अनेक पालकांनी याबद्दल तक्रारी केल्या असून, ही रक्कम कोणत्या खात्यात जमा केली गेली याचा कोणताही हिशोब उपलब्ध नाही, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, ही शाळा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान आणि शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीतून चालवली जाते. असे असतानाही पालकांकडून अनधिकृतपणे पैसे गोळा करणे अत्यंत संशयास्पद आहे.
याशिवाय, शाळेतील इयत्ता आठवीच्या एका विद्यार्थ्याला शिक्षकाने बेशुद्ध होईपर्यंत बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटनाही उघडकीस आली आहे. याप्रकरणी संबंधित पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
शिवसेनेच्या प्रमुख मागण्या:
- आर्थिक गैरव्यवहार आणि विद्यार्थी मारहाण या दोन्ही प्रकरणांची सखोल आणि पारदर्शक चौकशी करण्यासाठी स्वतंत्र समितीची स्थापना करावी.
- चौकशीत दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
प्रशासनाने या गंभीर प्रकरणांची तातडीने दखल न घेतल्यास, शिवसेना तीव्र आंदोलन छेडेल आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीला प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही श्री. जाधव यांनी दिला आहे.