तुळजापूर : धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर विधानसभा मतदारसंघात सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान तब्बल सहा हजारांहून अधिक बोगस मतदारांची नावे मतदार यादीत घुसडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी स्थानिक पोलीस प्रशासनाकडून तपासात दिरंगाई होत असल्याचा आरोप करत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली असून, या गंभीर प्रकरणी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
खासदार राजेनिंबाळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, तुळजापूर विधानसभा-241 (महा) मतदारसंघातील मतदार यादीत जाणीवपूर्वक सहा हजारांपेक्षा जास्त बोगस नावांचा समावेश करण्यात आला होता. ही बाब सुरुवातीला राज्य निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यानंतर, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन खासदार राजेनिंबाळकर यांनी थेट केंद्रीय निवडणूक आयुक्तांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली.
गुन्हा दाखल, पण पोलीस तपासात दिरंगाईचा आरोप
या प्रकरणी १७ ऑक्टोबर २०२४ रोजी तुळजापूरचे तहसीलदार अरविंद शंकर बोळंगे यांनी पुढाकार घेत तुळजापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला होता. मात्र, प्रकरणाचे तपास अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक देशमुख यांनी राजकीय दबावामुळे किंवा अन्य कारणांमुळे आरोपींवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचा गंभीर आरोप खासदार राजेनिंबाळकर यांनी आपल्या निवेदनात केला आहे. पोलिसांच्या या हलगर्जीपणामुळेच थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
लोकशाहीला धोका; नागरिकांमध्ये संताप
बोगस मतदार नोंदणीच्या या प्रकारामुळे भारतीय लोकशाहीची मूलभूत मूल्ये धोक्यात आली असून, निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत. अशा गैरप्रकारांना वेळीच आळा न घातल्यास भविष्यात याला प्रोत्साहन मिळण्याचा धोकाही व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांवर आणि तपासात जाणूनबुजून दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे.
खासदार राजेनिंबाळकर यांच्या तक्रारीनंतर आता केंद्रीय निवडणूक आयोग या प्रकरणी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आयोगाच्या संभाव्य कारवाईमुळे या गैरप्रकारात सहभागी असलेल्या राजकीय व्यक्तींचे धाबे दणाणले आहेत.