शिराढोण: रस्त्यावर उभे राहण्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून आठ जणांच्या जमावाने एकाच कुटुंबातील चार जणांना शिवीगाळ करत काठ्या व विटांनी बेदम मारहाण केल्याची घटना कळंब तालुक्यातील वडगाव येथे घडली आहे. याप्रकरणी शिराढोण पोलीस ठाण्यात आठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना शनिवार, दि. २३ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली. सुवर्णा यल्लाप्पा बंडगर (वय ४०, रा. वडगाव) यांनी याप्रकरणी २५ ऑगस्ट रोजी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, त्यांचे पती यल्लाप्पा बंडगर, शारदाबाई चव्हाण, धर्मराज बंडगर आणि शिटीबा बंडगर हे वडगाव येथील रस्त्यावर उभे होते. यावेळी आरोपींनी रस्त्यावर का उभे राहिलात, असे म्हणत वाद घालण्यास सुरुवात केली.
यानंतर आरोपी विलास गोपाळ बंडगर, जयश्री सुरेश बंडगर, युवराज शिवाजी बंडगर, गोपाल गोविंद बंडगर, दुर्गाबाई गोपाल बंडगर आणि इतर तीन अनोळखी व्यक्तींनी गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादीच्या कुटुंबीयांना शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्क्या, काठी आणि विटांनी मारहाण करून त्यांना जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली.
सुवर्णा बंडगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिराढोण पोलिसांनी आठही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), १८९(२), १९१(१)(२), १९१(३) आणि १९० अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.