धाराशिव: जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या, विशेषतः गेल्या चार दिवसांतील अतिवृष्टीने हाहाकार माजवला असून, प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार तब्बल दोन लाख २६ हजार ७०६ हेक्टरवरील पिके आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीचा फटका जिल्ह्यातील ३६३ गावांमधील एक लाख ९८ हजार ३७५ शेतकऱ्यांना बसला आहे. पावसामुळे दोन व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला असून, २०७ जनावरे दगावली आहेत. तसेच, एक हजार ४८ घरांची पडझड झाली आहे.
जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू केले असून, बाधित नागरिकांना तातडीने मदत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहे. जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकाच वेळी सप्टेंबरमधील नुकसानीचे पंचनामे आणि ऑगस्ट महिन्यातील मंजूर अनुदानाच्या वाटपाचे काम वेगाने सुरू आहे. ऑगस्ट महिन्याचे अनुदान वाटप आजपासून सुरू करण्यात आले असून, सध्याच्या नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठवून तातडीने निधीची मागणी केली जाणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, दोन लाख दोन हजार ८३९ हेक्टर जिरायती, २१ हजार ४४२ हेक्टर बागायती आणि दोन हजार ४२५ हेक्टरवरील फळपिकांचे ३३ टक्क्यांहून अधिक नुकसान झाले आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. विविध ठिकाणी अडकलेल्या ४९८ नागरिकांना एनडीआरएफ, लष्कर आणि स्थानिक प्रशासनाच्या पथकांनी सुरक्षित बाहेर काढले. पुरामुळे १६ गावांचा संपर्क तुटला होता, जो आता पूर्ववत करण्यात आला आहे.
अतिवृष्टीचा फटका केवळ शेतीलाच नाही, तर सार्वजनिक मालमत्तेलाही बसला आहे. जिल्ह्यात १५ तलाव फुटले असून, १२ रस्ते आणि तीन पूल वाहून गेले आहेत. याशिवाय, एक हजार ३७ कच्च्या घरांची पडझड झाली असून सात घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत. चार गोठ्यांचेही नुकसान झाले आहे.
अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका परंडा तालुक्याला बसला आहे. येथील ५२ हजार ५०० शेतकऱ्यांचे तब्बल ५८ हजार १०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. सर्वात कमी फटका कळंब तालुक्याला बसला आहे.
तालुकानिहाय नुकसानीचा प्राथमिक तपशील:
तालुका | बाधित शेतकरी | बाधित गावे | बाधित क्षेत्र (हेक्टरमध्ये) |
धाराशिव | २६,००० | ५४ | ४४,०६० |
तुळजापूर | ३७,००० | ४८ | ३९,८५० |
उमरगा | ५१,३४५ | ८१ | ५४,२०६ |
लोहारा | ६,००० | ११ | ७,६९० |
भूम | २२,००० | ३० | १७,३२० |
परंडा | ५२,५०० | ९१ | ५८,१०० |
कळंब | २३० | २५ | ३३० |
वाशी | ३,३०० | २३ | ५,१५० |
जिल्ह्यातील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असून, जिल्हा प्रशासन पंचनामे आणि अनुदान वाटपाच्या कामावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. आगामी काळात पावसाचा अंदाज लक्षात घेऊन प्रशासन कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी पुजार यांनी सांगितले.