उमरगा – शेतजमिनीच्या जुन्या वादातून गैरकायद्याची मंडळी जमवून ५२ वर्षीय व्यक्तीला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी आणि कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण केल्याची घटना उमरगा तालुक्यात घडली आहे. या हल्ल्यात पीडित व्यक्ती जखमी झाली असून, जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली आहे. याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात एकाच कुटुंबातील चौघांसह एकूण पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी लहू माणिक माने (वय ५२ वर्षे, रा. कासार शिरशी, ता. निलंगा, जि. लातूर) यांचा आरोपींसोबत शेतीचा वाद सुरू आहे. याच वादातून गुरुवारी, दि. ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आरोपींनी संगनमत करून गैरकायदेशीर जमाव जमवला.
आरोपी विजयकुमार वीरभद्रप्पा शिंगारे, राजश्री विजयकुमार शिंगारे, साक्षी विजयकुमार शिंगारे, रेखा वीरभद्रप्पा शिंगारे (सर्व रा. कासार शिरशी, ता. निलंगा, जि. लातूर) आणि अण्णा रावसाहेब भोसले (रा. कदमापूर, ता. उमरगा) यांनी लहू माने यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांना लाथाबुक्क्यांनी आणि कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण करून जखमी केले व जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
या घटनेनंतर लहू माने यांनी त्याच दिवशी उमरगा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पाचही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १८९(२), १९०, १९१(२), १९१(३), ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. प्रकरणाचा पुढील तपास उमरगा पोलीस करत आहेत.