उमरगा – तालुक्यातील कदमापूर शिवारात शेतजमिनीच्या वादातून एका ५५ वर्षीय व्यक्तीला आणि त्यांच्या कुटुंबियांना सहा जणांनी मिळून जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विजयकुमार विरभद्राप्पा शिंगारे (वय ५५, रा. कासार शिरशी, ता. निलंगा, जि. लातूर) यांची कदमापूर शेत शिवारातील सर्व्हे नंबर १७ मध्ये जमीन आहे. याच जमिनीच्या वादातून दिगंबर माणिक माने, लहु माणिक माने, करण लहु माने, दिपक लहु माने, चंदन लहु माने आणि विक्रम अंकुश माने (सर्व रा. कासार शिरशी) यांनी संगनमत करून गैरकायद्याची मंडळी जमवली.
गुरुवार, दिनांक ९ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आरोपींनी शिंगारे यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी आणि हंटरने मारहाण केली. यावेळी भांडण सोडवण्यासाठी आलेल्या शिंगारे यांच्या पत्नी आणि मुलीलाही आरोपींनी शिवीगाळ करत मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली.
या घटनेनंतर विजयकुमार शिंगारे यांनी शुक्रवारी, १० ऑक्टोबर रोजी उमरगा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सहाही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १८९(२), १९०, १९१(२), १९१(३), ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.