धाराशिव: सामायिक क्षेत्रातील नुकसान भरपाईची रक्कम का अडवली, या कारणावरून एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना धाराशिव तालुक्यातील घाटंग्री येथे घडली आहे. पाच जणांच्या टोळक्याने घरात घुसून महिलांना लोखंडी रॉड आणि दगडाने जबर मारहाण केली. याप्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २ डिसेंबर रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घाटंग्री तांडा येथे घडली. आरोपी आणि फिर्यादी यांच्यात सामायिक क्षेत्रातील जमिनीच्या नुकसान भरपाईवरून वाद होता. फिर्यादीने ही भरपाई का अडवली, याचा राग मनात धरून आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवली.
आरोपींनी फिर्यादी विजया गोकुळ राठोड (वय ३९), त्यांची सासू आणि जाऊ यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता, आरोपींनी हातातील लोखंडी रॉड आणि दगडाने महिलांना मारहाण करून जखमी केले. यावेळी सोडवासोडव करण्यासाठी आलेल्या फिर्यादीच्या पतीलाही मारहाण करण्यात आली आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.
आरोपींची नावे:
याप्रकरणी विजया राठोड यांनी गुरुवारी (दि. ४) दिलेल्या तक्रारीवरून खालील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे:
१. सुरजितसिंह महादेव राठोड २. सागरसिंह महादेव राठोड ३. सुनिता महादेव राठोड ४. लता सागर राठोड ५. सायली सचिन जाधव (सर्व रा. घाटंग्री, ता. जि. धाराशिव) धाराशिव ग्रामीण पोलिसांनी या पाचही जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२)(३), १८९(२), १९१(२)(३) आणि १९० अन्वये गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.






