महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी दररोज हजारो भाविक तुळजापुरात येतात. ज्या नगरीतून संपूर्ण राज्याला प्रेरणेची आणि मांगल्याची ऊर्जा मिळते, त्याच नगरीत आज रक्ताचे सडे पडत आहेत. १६ डिसेंबरची ती सायंकाळ केवळ एका राजकीय कार्यकर्त्यावर झालेला हल्ला नव्हती, तर ती तुळजापूरच्या शांततेवर, संस्कृतीवर आणि एकूणच कायदा-सुव्यवस्थेवर झालेली गोळीबार आहे. भरदिवसा हातात तलवारी, कोयते आणि पिस्तूल घेऊन गुंड धुमाकूळ घालतात आणि पोलीस यंत्रणा मात्र केवळ बघ्याची भूमिका घेते, हे पाहून प्रश्न पडतो—हे ‘रामराज्य’ आहे की ‘गुंडराज्य’?
तुळजापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीचा धुराळा उडत असताना, राजकारण कोणत्या थराला जाऊ शकते, याचे हिडीस प्रदर्शन मंगळवारी लोहिया मार्गावर पाहायला मिळाले. काँग्रेसचे उमेदवार अमर मगर यांचे बंधू कुलदीप मगर यांच्यावर ज्या पद्धतीने जीवघेणा हल्ला झाला, तो पाहता हा केवळ वैयक्तिक वाद वाटत नाही. “तू आमच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार का केलास?” असे विचारत डोक्यात कोयते घालणे आणि गोळीबार करणे, ही थेट लोकशाहीची हत्या करण्याची प्रवृत्ती आहे. या हल्ल्यातील आरोपींचे ‘कनेक्शन’ भाजपचे उमेदवार आणि ड्रग्ज प्रकरणातील संशयितांशी असल्याचे समोर येत आहे, ही बाब अत्यंत गंभीर आहे.
पोलिसांचा वचक संपला की ‘मॅनेज’ झाला?
महाविकास आघाडीने उपस्थित केलेले प्रश्न दुर्लक्षित करण्यासारखे नाहीत. शहरात दोन तास नंगानाच सुरू असताना उपविभागीय पोलीस अधिकारी घटनास्थळी फिरकत नाहीत, हा योगायोग समजावा की सत्तेचा दबाव? तुळजापूरसारख्या संवेदनशील शहरात गुंडांकडे २०-२० गावठी कट्टे (पिस्तूल) येतात कुठून? शहरात ड्रग्ज आणि अवैध धंद्यांचे पेव फुटले असताना पोलीस प्रशासन झोपलेले होते का? की सत्तेच्या वरदहस्ताखाली या गुंडांना अभय दिले जात आहे? स्वतः जखमी कुलदीप मगर यांनी दोन आरोपींना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले, यावरून पोलिसांची तत्परता किती ‘शून्य’ होती, हेच स्पष्ट होते.
ड्रग्ज माफिया आणि राजकारण
काँग्रेस जिल्हाध्यक्ष ॲड. धीरज पाटील यांनी केलेला ‘ड्रग्ज माफिया’ कनेक्शनचा आरोप धक्कादायक आहे. जर आरोपींचा संबंध ड्रग्ज प्रकरणाशी असेल, तर यामागचा ‘मास्टरमाईंड’ शोधणे पोलिसांचे कर्तव्य आहे. केवळ हाताखालच्या गुंडांवर गुन्हे दाखल करून हे प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न झाला, तर तुळजापूरची जनता ते खपवून घेणार नाही. लोकशाहीत मताने उत्तर द्यायचे असते, पण येथे ‘गोळ्यांनी’ आणि ‘कोयत्यांनी’ उत्तर देण्याची भाषा सुरू झाली आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर महाविकास आघाडीने थेट निशाणा साधला आहे. आपल्या कार्यकर्त्यांकडून होणारी गुंडगिरी लोकप्रतिनिधींना मान्य आहे का? असा प्रश्न आता सामान्य नागरिक विचारत आहेत.
भयमुक्त तुळजापूरसाठी लढा हवा!
तुळजापूर हे केवळ एक शहर नाही, ते कोट्यवधी लोकांचे श्रद्धास्थान आहे. अशा ठिकाणी गुंडागर्दीचे केंद्र होणे, ही पवित्र नगरीची बदनामी आहे. आज कुलदीप मगर आहेत, उद्या कोणताही सामान्य नागरिक किंवा भाविक या दहशतीचा बळी ठरू शकतो. पोलीस प्रशासनाने आतातरी आपली कणाहीन भूमिका सोडावी. सत्ता कोणाचीही असो, कायदा सर्वांसाठी समान असला पाहिजे.
जर या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांना अटक झाली नाही आणि शहरात शस्त्रे फिरवणाऱ्या गुंडांचा बंदोबस्त झाला नाही, तर जनतेचा संताप रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. पोलीस निरीक्षक अन्नासाहेब मांजरे यांच्यासमोर आता या प्रकरणाचा निष्पक्ष तपास करण्याचे मोठे आव्हान आहे. सत्तेच्या तालावर नाचणारे प्रशासन जनतेचा विश्वास गमावून बसते, हे त्यांनी लक्षात ठेवावे.
शक्तीपीठात रक्ताचा सडा टाकणाऱ्या प्रवृत्तींचा वेळीच बंदोबस्त करा, अन्यथा तुळजापूरच्या इतिहासात हा काळ ‘दहशतीचा अध्याय’ म्हणून नोंदवला जाईल. प्रशासनाने ही गुंडगिरी मोडून काढावी, हीच धाराशिवकरांची अपेक्षा आहे!
– सुनील ढेपे, संपादक, धाराशिव लाइव्ह







