तुळजापूर – शहरातील एका मूकबधिर तरुणाला क्षुल्लक कारणावरून हात बांधून अमानुष मारहाण केल्याची संतापजनक घटना तुळजापुरात घडली आहे. विशेष म्हणजे, या गंभीर प्रकरणात सुरुवातीला गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली होती. मात्र, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी या प्रकरणात लक्ष घालत पोलीस निरीक्षकांना फोन केल्यानंतर यंत्रणा हलली आणि पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
नेमकी घटना काय?
फिर्यादी कांताबाई अभिमान चौगुले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा चुलत भाऊ राजेश श्रीमंत पवार (वय ३२, रा. घाटशीळ रोड) हा मूकबधिर आहे. रविवार, २२ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास मलबा हॉस्पिटल समोर असलेल्या जगदाळे कॉम्प्लेक्सच्या पार्किंगमध्ये ही घटना घडली. पार्किंगच्या वादातून आणि ‘तू आमच्या भागात का आलास?’ असे म्हणत आरोपींनी राजेश याचे दोन्ही हात बांधले. त्याला लाथाबुक्क्यांनी आणि काठीने डोक्यावर, पाठीवर, तोंडावर आणि गुप्त भागावर बेदम मारहाण केली.
या मारहाणीत राजेश गंभीर जखमी झाला असून त्याचे शरीर काळेनिळे पडले आहे. सोडवण्यासाठी गेलेल्या राजेशची आई, मावशी आणि बहिणीलाही आरोपींनी धक्काबुक्की व शिवीगाळ केली.


पोलिसांची टाळाटाळ आणि मंत्र्यांचा ‘दणका’
मूकबधिर तरुणाला मारहाण झाल्यानंतर पीडित कुटुंब पोलीस ठाण्यात गेले, मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास विलंब केला. ही बाब शिवसेना (शिंदे गट) तालुकाप्रमुख अमोल जाधव यांना समजताच त्यांनी यात पुढाकार घेतला. योगायोगाने केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव हे तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी तुळजापुरात आले होते. अमोल जाधव यांनी ही बाब मंत्र्यांच्या कानावर घातली. घटनेचे गांभीर्य ओळखून ना. प्रतापराव जाधव यांनी तात्काळ पोलीस निरीक्षक मांजरे यांना फोन लावून जाब विचारला. मंत्र्यांचा फोन येताच सूत्रे हलली आणि रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला.
यांच्यावर झाला गुन्हा दाखल
याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) 118(1), 115 (2), 190,191(2), 191(3), 92 आणि अपंग व्यक्तींचे अधिकार अधिनियम २०१६ (कलम ९२) अन्वये खालील ५ जणांवर गुन्हा (क्र. ०५२३/२०२५) दाखल करण्यात आला आहे:
१. सुरज हरिश्चंद्र जगदाळे २. प्रतिक जगदाळे ३. गणेश जगदाळे ४. राजाभाऊ देशमाने ५. शंतनू नरवडे (सर्व रा. तुळजापूर खुर्द)
आरोपी हे एका भाजप नगरसेवकाचे भाचे आणि पुतणे आहेत. एका राजकीय नेत्याच्या दबावामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता, परंतु राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या फोनमुळे सूत्रे हलली.
पुढील तपास पोलीस निरीक्षक नामदेव मद्दे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. एका मूकबधिर व्यक्तीवरील हल्ल्याची दखल घेण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांना हस्तक्षेप करावा लागल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.







