कळंब: तांदुळवाडी (ता. कळंब) येथे ‘ईव्हीएम हटाव’ मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणादरम्यान उपोषणकर्त्याला उपचारासाठी दवाखान्यात हलवत असताना पोलिसांवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जमावाने ॲम्ब्युलन्स अडवून पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली. या प्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात ८ नामनिर्देशित आणि इतर १० अशा एकूण १८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना २८ जानेवारी २०२६ रोजी दुपारी २:१० वाजताच्या सुमारास तांदुळवाडी येथे घडली.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, तांदुळवाडी येथे बाळराजे रामराव आवारे पाटील हे ‘ईव्हीएम हटाव’ या मागणीसाठी उपोषणास बसले होते. दरम्यान, त्यांची प्रकृती खालावल्याने डॉ. सुमित मुंढे यांनी त्यांना तातडीने उपचार करणे गरजेचे असल्याचे पत्र दिले. या पत्राच्या अनुषंगाने कळंब पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी बाळराजे पाटील यांना उपचारासाठी ॲम्बुलन्समधून दवाखान्यात घेऊन जात होते.
मात्र, यावेळी उपोषणकर्त्यांच्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेतली. जमावाने गैरकायद्याची मंडळी जमवून ॲम्बुलन्स आणि सरकारी गाडीसमोर झोपून रस्ता अडवला. पोलिसांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद वाढल्याने जमावाने पोलिसांना लाथाबुक्यांनी मारहाण करून जखमी केले आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केला.
या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभा दासराव पुंडगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खालील आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे:
१. आण्णासाहेब जाधव २. पुष्पक देशमुख ३. संदीप चाळक ४. विशाल कुटे ५. लमण पाटील ६. राजेश्री पाटील ७. हिमानी मोहोड ८. आणि इतर १० अनोळखी इसम.
शासकीय कामात अडथळा आणणे, मारहाण करणे आणि दंगल माजवल्याप्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (B.N.S.) कलम १३२, १२१(१), १८९(२), १९०, १९१, ३५२ आणि २२१ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास कळंब पोलीस करत आहेत.







